no images were found
पर्यावरण वाचले तरच माणूस वाचेल: डॉ. सुधीर कुंभार
कोल्हापूर, (प्रतिनिधी): पर्यावरण वाचले तरच माणूस वाचेल, म्हणून पर्यावरण समजून घेणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन पर्यावरण अभ्यासक डॉ. सुधीर कुंभार यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्या वतीने कोते (ता. राधानगरी) येथील शासकीय आश्रमशाळेत आदिवासी आश्रमशाळा स्कूल कनेक्ट कार्यक्रमांतर्गत ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पर्यावरण’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. केंद्राचे समन्वयक डॉ. श्रीकृष्ण महाजन अध्यक्षस्थानी होते.
डॉ. कुंभार म्हणाले, वणवा पेटवू नका. वणवा लागला तर तो कसा विझवायचा, हे शिकून घ्या. वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासा. सर्प शेतकऱ्याचा, आपला मित्र आहे. त्यांना मारु नका. झाडे लावून जगविली पाहिजेत. निसर्ग वाचवणे हे आपले कर्तव्य आहे. यावेळी सीड बॉल्स तसेच गांडूळ खत तयार करण्याची प्रक्रिया, जलसंवर्धनाची प्रक्रिया त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.
यावेळी अविनाश भाले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक जगन्नाथ दराडे यांनी आभार मानले. यावेळी आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.