no images were found
नरहरी झिरवळ यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा-हेमंत पाटील:व्हायरल व्हिडियोची सत्यता समोर येणे आवश्यक
पुणे,:-राज्यात सध्या गाजत असलेले भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण ताजे असतांना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नरहरी झिरवळ यांचा एक वादग्रस्त व्हिडियो व्हायरल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना पेव फुटले आहे. या व्हिडियोची सत्यता समोर येणे अत्यंत आवश्यक आहे.जोपर्यंत या प्रकरणाची सखोल चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत मंत्री महोदयांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा त्याग करावा,अशी मागणी भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केली आहे.
शासकीय निवासस्थानी अशा प्रकारचे गैरवर्तन होत असल्याचे व्हिडिओ समोर येणे ही गंभीर बाब आहे. यामुळे प्रशासनाच्या प्रतिमेला तडा जातो, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. दोन-तीन व्हिडिओ एकत्रित जोडून हा व्हिडियो तयार करण्यात आल्याचा दावा झिरवळांनी केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. सरकार या व्हिडिओची तांत्रिक तपासणी, शाहनिशा आणि सत्यता तपासल्यानंतरच निर्णय घेणार आहे. पंरतु, शासकीय निवासस्थानी असे गैरवर्तनाचे व्हिडिओ समोर येत असतील तर यातील सत्यता जनतेसमोर येवून संबंधित सर्वांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता पाटील यांनी अधोरेखित केली.
एफडीए विभागातील लाचखोरी प्रकरणामुळे झिरवळ या आधी अडचणीत आले होते. त्या प्रकरणात त्यांचा हात नसल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीन चिट दिली होती.केवळ क्लीन चिट मिळवणे पुरेसे नाही; सार्वजनिक जीवनात वावरताना नैतिकतेचे पालन नेते मंडळीकडून अपेक्षित असते. झिरवळ यांच्या शासकीय निवासस्थानावरील व्हिडिओ व्हायरल झाल्याने ते पुन्हा अडचणीत आले आहेत. अशात त्यांनी चौकशी पुर्ण होईस्तव राजीनामा देणे गरजेचे असल्याचे पाटील म्हणाले.