
no images were found
आम्ही मुख्यमंत्रिपद मागायला गेलो तेव्हा…
नागपूर : ‘ज्या अडीच वर्षांसाठी शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) भाजपशी काडीमोड घेतला, तीच मागणी आम्ही केली असता उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य नेते मौन होते’, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) पहिलाच संकल्प मेळावा शनिवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झाला. याद्वारे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी सत्तेत सहभागी होण्याची भूमिका मांडली. ४३ आमदारांचे लाभलेले बळ, पक्षाची मान्यता व चिन्ह अबाधित राहील, अशी ग्वाही देत मनातील किंतू-परंतु दूर करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. सुमारे ४५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी आतापर्यंत पक्षाला कसे दुय्यम स्थान मिळत गेले, याचाही उल्लेख केला.
‘शिवसेनेचे ५६ आणि आपले ५४ होते. याआधारे अडीच नाही तर किमान दोन वर्षे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद अपेक्षित होते. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलो असता त्यावेळी तोंड उघडण्यास ते तयार नव्हते. त्यावेळी आदित्य ठाकरे व संजय राऊतदेखील उपस्थित होते. मात्र, कुणीही बोलले नाही. राष्ट्रवादीला अनेकवेळा संधी आली. मात्र, प्रत्येकवेळी आपण गमावली. काँग्रेसने सुरुवातीपासून झुकते माप घेतले व आपल्याला ठराविक जागा दिल्या. प्रत्येकवेळी आम्ही माघार घ्यायची का, पहिल्या क्रमांकावर येण्याची आशा बाळगायची नाही का’, असे सवाल करून ‘भाजपकडून पूर्ण न्याय मिळणार आहे. यापुढे आपला पक्ष अधिक बळकट करू’ असे पटेल यांनी सांगितले.
‘पक्षाचे नाव, चिन्ह मिळेल की नाही, याची चिंता करू नका. आपल्यासोबत ४३ आमदार आहेत. आणखी येतील. बहुसंख्य कार्यकर्ते सोबत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग योग्य निर्णय घेईल. काटोल-नरखेडमधील इतरांना आधी जागा मिळायची का? पक्षाने अनेक नेत्यांना बळ दिले. पण, त्यांनी इतरांना संधी दिली नाही व दुसरी फळी तयार केली नाही, ही शोकांतिका आहे’, असे पटेल म्हणाले.