
no images were found
भूमिपूजन जलजीवन योजनेचे, चर्चा श्रेयवादाची
कागल : महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोट्यावधींचा निधी खेचून आणला. परंतु; सहा महिन्यापूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर बिळात लपून बसलेले बाहेर पडले आहेत. ते काहीही संबंध नसताना सगळी कामे आम्हीच मंजूर केली आहेत असे सांगत विकास कामांचा श्रेयवाद रंगवत आहेत, असा टोला आ. हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांना अप्रत्यक्ष लगावला. यावेळी संजय घाटगे यांनीही श्रेयवादावरून टीका केली.
सावर्डे बुद्रुक ता. कागल येथे पाच कोटी रुपये निधीच्या जलजीवन पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमात आ. मुश्रीफ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. संजयबाबा घाटगे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. वीरेंद्रसिंह मंडलिक उपस्थित होते.
यावेळी आ. मुश्रीफ म्हणाले, कोणतेही संविधानिक पद नसलेले किंबहुना ग्रामपंचायतीला साधे सदस्य म्हणूनसुद्धा निवडून न आलेले आम्ही आणलेल्या विकास कामाच्या प्रत्येक गोष्टीवर आपला हक्क सांगत आहेत, हे आश्चर्यकारक आहे.
ॲड. वीरेंद्रसिंह मंडलिक म्हणाले, या तालुक्याला दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक आणि अलीकडच्या काळात आ. हसन मुश्रीफ यांची विकासाची परंपरा आहे. कागल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सगळे एक होऊन काम करूया.
माजी आ. संजय घाटगे म्हणाले, मिळालेली सत्ता ही जनतेची असते या भावनेने आ. मुश्रीफ यांनी सत्तेचा अंश आणि अंश गोरगरिबांच्या सेवेसाठी वापरला. पण देशात गुंतवणुकीसाठी परदेशी कंपन्या येत असतात. देशातील बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळेल या भावनेने सरकार त्यांच्याशी करार करीत असते. अशी एखादी दहा- वीस हजार नोकऱ्या मिळणारी कंपनी सांगा. तीही मीच आणली आणि मीच नोकऱ्या लावल्या असे म्हणणारेही आहेत अशी टीकाही त्यांनी समरजित घाटगे यांच्यावर केली.यावेळी कृष्णात शिरसे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी सरपंच डॉ. इंद्रजित पाटील, माजी सरपंच शंकर जाधव, माजी सरपंच डॉ. संजय चिंदगे, माजी सरपंच रघुनाथ सिरसे, कृष्णात शिरसे, उपसरपंच सागर सावर्डेकर, ग्रामपंचायत सदस्य विनोद कांबळे, पांडुरंग काशीद, विलास अस्वले, शीतल हिरुगडे, मालुताई चिंदगे, पी. डी. हिरुगडे, रफिक इनामदार, सखाराम पाटील, आनंदा म्हतूगडे, शिवाजी निकम, आदी उपस्थित होते.