no images were found
अर्थसंकल्प ठरतोय महाराष्ट्राच्या विकासाचा ‘महासंकल्प’!:अर्थसंकल्पातून प्रगत राज्याची पायाभरणी होईल; हेमंत पाटील यांचे प्रतिपादन
मुंबई,: महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा खेळ नसून, तो २०४७ च्या विकसित भारताच्या स्वप्नातील महाराष्ट्राचा वाटा निश्चित करणारा एक ‘महासंकल्प’ आहे, असे प्रतिपादन भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केले आहे. अर्थसंकल्पातून शेतकरी, महिला, युवक आणि पायाभूत सुविधा अशा सर्वच क्षेत्रांना न्याय मिळाल्या आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन सरकारने पूर्ण केले आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतचे २ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर करणे, हा धाडसी निर्णय आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देऊन फडणवीस सरकारने प्रामाणिक शेतकऱ्यांचा सन्मान केला असल्याचे पाटील म्हणाले.
राज्यात १२०० किमीचे मेट्रो मार्ग आणि ६ हजार किमीचे द्रुतगती मार्ग उभारण्याची घोषणा महाराष्ट्राला दळणवळण क्षेत्रात जागतिक स्तरावर नेऊन ठेवेल. ५० लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आणि सूक्ष्म-लघू उद्योगांना दिलेले प्रोत्साहन यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल. विशेषतः मुंबई आणि पुण्याला ५० अब्ज डॉलरचे केंद्र बनवण्याचे स्वप्न महाराष्ट्राला ‘ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’कडे नेणारे ठरेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त समिती स्थापन करणे आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू ठेवण्याचा निर्णय हा सामाजिक बांधिलकी जपणारा आहे. अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या नावाने नागरी पुरस्कार सुरू करणे ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीतील एक सुसंस्कृत पाऊल आहे,” असेही हेमंत पाटील यांनी नमूद केले आहे.
एकूणच, तंत्रज्ञानाची जोड (एआय), नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन आणि पर्यटनासाठी ‘रोप-वे’ सारखे प्रकल्प यांमुळे हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक ठरला असून, भ्रष्टाचाराला थारा न देता पारदर्शक अंमलबजावणी झाल्यास महाराष्ट्र देशात अव्वल राहील, असे मत पाटील यांनी व्यक्त केली.