
no images were found
कोल्हापुरमध्ये तीन दिवसानंतर गुळ सौदे पूर्ववत सुरु
कोल्हापूरच्या नावावर कर्नाटकी गूळ विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाला किमान 3700 रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ गुळ उत्पादक शेतकऱ्यानी गुळ सौदे बंद पडले होते. तब्बल तीन दिवसानंतर मार्केट यार्डात गुळाचे सौदे पूर्ववत सुरु झाल्याचे चित्र आहे. बाजार समितीचे उपसचिव के. डी. पाटील यांच्या उपस्थितीत गूळ सौदा पार पडला.
कोल्हापुरमध्ये कर्नाटकी गुळाची सध्या आवक वाढल्यामुळे येथील स्थानिक उत्पादकांच्या गुळास मागणी कमी झाली होती. या कारणामुळे उत्पादकांच्या गुळ सौद्याला योग्य दर मिळत नसल्याच्या कारणास्तव काही दिवस बंद ठेवण्यात आलेले गुळ सौदे आज पुन्हा सुरु झाले. स्थानिक गुळ उत्पाद्क शेतकऱ्यांनी २२ नोव्हेंबरला कर्नाटकात तयार झालेला गूळ हा कोल्हापूरचा गूळ म्हणून विक्रीसाठी आणला जात असल्याचे प्रशासकांच्या निदर्शनास आणले होते. यावर कायदेशीरित्या कारवाई करण्याची मागणी गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी प्रशासकांकडे केली होती. दरम्यान प्रशासकांनी सर्वाधिकरांचा वापर करून या ठिकाणी कारवाई करू असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते.
या पार्श्वभूमीवर ‘कर्नाटकातील गूळ’ आणून ‘कोल्हापूर’च्या नावावर विक्री करणाऱ्यांवर थेट फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला दिले आहेत. गुळाची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा तातडीने उभा करा, शेतकऱ्याला गुळाच्या गुणवत्तेनुसारच पैसे मिळतील. कर्नाटकातील गुळाला आत प्रवेशच द्यायचा नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. भरारी पथकाची नियुक्ती करण्याचे आदेशही दिले आहेत. सोमवारपासून भरारी पथकासह प्रवेशद्वारावरून बाहेरील गुळाला प्रवेश देऊ नका, अशी सूचना त्यांनी समिती प्रशासनाला दिली आहे.
‘गूळ सौदे बंद ठेवून कोणाचाही लाभ होणार नाही. गूळ सौदे तातडीने सुरू करावेत. कर्नाटकातून येणाऱ्या गुळाला कोल्हापुरी गुळाचा शिक्का मारला जात असेल तर असा प्रकार थांबवावा. बाजार समितीने भरारी पथक स्थापन करून संबंधितांवर कारवाई करावी. या भरारी पथकात बाजार समिती, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी घ्यावेत. शेतकऱ्यांनी चांगला गूळ बनवावा. त्याला व्यापाऱ्यांनीही चांगला भाव द्यावा’, असे जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले