no images were found
महावितरण अलिबाग येथील चौल-२ शाखा कार्यालय ठरले रायगड जिल्ह्यातील प्रथम १००% स्मार्ट मीटर बसवलेले कार्यालय
रायगड, :सध्या राज्यात सगळीकडे महावितरणतर्फे स्मार्ट मीटर बसविण्याचे काम चालू असून कोंकण प्रादेशिक विभागाने सर्वाधिक ४३ लाख ३ हजार मीटर लावले आहेत. यामध्ये भांडुप परिमंडल १० लाखाहून अधिक स्मार्ट मीटर बसवून दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच, स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया सुरू असून दिवसंदिवस स्मार्ट मीटरच्या लाभार्थ्यांची संख्या वाढत आहे. रायगड जिल्ह्यातील महावितरणच्या पेण मंडळ कार्यालय अंतर्गत एकूण ०४ विभाग व १७ उपविभाग तसेच १०५ शाखा कार्यालय आहेत. यापैकी अलिबाग-१ उपविभागातील चौल-२ शाखा कार्यालयाचे एकूण १,५७० ग्राहकांचे १००% मीटर बदललेले असून हे कार्यालय रायगड जिल्ह्यातील १००% स्मार्ट मीटर बसविलेले प्रथम शाखा कार्यालय ठरले आहे.
स्मार्ट मीटर मुळे ग्राहकांना अचूक रीडिंगची देणे शक्य झाले आहे,ग्राहकांना त्यांचा वीजवापर मोबाईल ऍप वर तपासता येतो, तसेच, सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वापरलेल्या विजेवर घरगुती वीज ग्राहकांना सूट मिळवता येते. त्याप्रमाणे, आतापर्यंत रायगड जिल्ह्यात तब्बल ३. ४० लाख वीज ग्राहकांना एकूण २.८३ कोटीची वीजबिलात सूट देण्यात आलेली आहे. स्मार्ट मीटर हे वीज क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आहे. यामुळे वीज वापराची माहिती तात्काळ आणि अचूकपणे मिळते. त्यामुळे मीटर रीडिंग घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष घरी येण्याची गरज राहत नाही. तसेच अंदाजे बिलाऐवजी ग्राहकांना अचूक आणि पारदर्शक वीजबिल मिळते. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना मोबाईल ऍपच्या माध्यमातून स्वतःचा वीज वापर पाहता येतो. त्यामुळे वीज बचतीचे नियोजन करणे सोपे होते. दिवसातील कमी दराच्या वेळेत वीज वापर केल्यास ग्राहकांना बिलात बचतही करता येते. वीज वितरण कंपन्यांसाठीही स्मार्ट मीटर उपयुक्त ठरत आहेत. यामुळे वीज चोरी, मीटरमध्ये छेडछाड आणि बिलिंगमधील चुका कमी होतात. तसेच वीज वापराची माहिती रिअल-टाईममध्ये उपलब्ध होत असल्याने वीजपुरवठ्याचे नियोजन अधिक चांगल्या पद्धतीने करता येते. बिघाड झाल्यास त्यावर त्वरित उपाययोजना करणेही शक्य होते. यामुळे वीज व्यवस्था अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनत आहे.
या कामासाठी चौल शाखा अभियंता श्री. देव्रत पवार व तेथील सर्व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांमध्ये जनजागृती व प्रबोधन करून ही कामगिरी केली आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वीज वापरावर नियंत्रण करणे शक्य असल्याचे करून दाखवले आहे. सदर कामगिरी पूर्ण करण्यासाठी अधीक्षक अभियंता पेण श्री. धनराज बिक्कड व उपविभागीय अधिकारी श्री. तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. मुख्य अभियंता भांडुप परिमंडल श्री. संजय पाटील यांनी या यशाबद्दल सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.