no images were found
कारगिलकडून महाराष्ट्रातील डेअरी इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी एकात्मिक दुग्धविकास उपक्रम
सांगली : कारगिलने सिंजेंटा फाउंडेशन इंडिया आणि डिजिटल ग्रीन इंडिया यांच्या भागीदारीत महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात दोन वर्षांचा एकात्मिक दुग्धविकास उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली. मुंबई मंत्रालयात पशुसंवर्धन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
या उपक्रमांतर्गत २.३ कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात येणार असून, अहिल्यानगरमधील १४० हून अधिक गावांतील ८,००० पेक्षा जास्त अल्पभूधारक दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. मोबाईल व्हेटर्नरी व्हॅन, एआय-आधारित ‘फार्मरचॅट’ अॅडव्हायझरी प्लॅटफॉर्म आणि क्षमता बांधणी प्रशिक्षणांच्या माध्यमातून पशु आरोग्य, दुग्ध उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.
राहुरी, राहाता आणि श्रीरामपूर तालुक्यांतील २६ गावांमध्ये दोन मोबाईल व्हेटर्नरी व्हॅन्सद्वारे पशुवैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील. या व्हॅन्समध्ये निदान साधने, औषधे आणि लसीकरणासाठी कोल्ड-चेन सुविधा उपलब्ध असतील. यामुळे पशुंच्या आरोग्य समस्यांवर वेळेत उपचार होऊन मृत्यूदर कमी करण्यास मदत होणार आहे.
डिजिटल ग्रीन इंडियाकडून ‘फार्मरचॅट’ हा एआय आणि आवाजावर आधारित डिजिटल सल्लागार प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकरी स्थानिक भाषेत आवाज, फोटो किंवा संदेशाद्वारे प्रश्न विचारू शकतील. तसेच पशुसखी आणि पॅरा-व्हेट्सना प्रशिक्षण देऊन गावपातळीवर पशुपालन, पोषण, स्वच्छता आणि डेअरी व्यवस्थापनाचे मार्गदर्शन केले जाईल.
यावेळी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, “पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय हा ग्रामीण विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने शेतकऱ्यांपर्यंत अधिक प्रभावी सेवा पोहोचवण्यास हा उपक्रम मदत करेल.”
कारगिल इंडियाचे अध्यक्ष रविंदर बलेन यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देईल. हा कार्यक्रम राज्याच्या पशुधन आधुनिकीकरण, डिजिटल शेती आणि ग्रामीण उत्पन्न वाढवण्याच्या धोरणांशी सुसंगत असून, भविष्यात इतर जिल्ह्यांमध्येही विस्तार करण्यात येणार आहे.