no images were found
ठाकरे बंधूंनी हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबत यावे!
: हेमंत पाटील
मुंबई, : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र येत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपसोबत युती करावी, असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी केली.
महाराष्ट्रीयन आणि हिंदुत्ववादी जनतेचा आवाज पुन्हा एकत्रित करण्याची ही योग्य वेळ आहे.राज आणि उद्धव ठाकरे हे दोघेही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेतून घडलेले नेते आहेत.दोघांनी आपसी मतभेद विसरून एकत्र येणे काळाची गरज आहे,असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
राज्यात हिंदुत्वासाठी एक प्रबळ राजकीय पर्याय उभा करण्यासाठी मनसे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आणि भाजपने एकत्रितपणे निवडणूक लढवावी.राज्याच्या राजकारणाला त्यामुळे नवी दिशा मिळू शकेल आणि स्थानिक पातळीवर निर्णायक आणि धोरणात्मक दृष्टीने योग्य सत्तास्थापन केले जाईल,असे पाटील म्हणाले.
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकीय राज आहे.अनेक ठिकाणी भ्रष्टाचार, अपारदर्शक कारभार आणि जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. या परिस्थितीत आगामी निवडणुकीत एक सशक्त, राष्ट्रवादी आणि हिंदुत्वनिष्ठ आघाडीच प्रभावी पर्याय ठरू शकते, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती तसेच ओबीसी बांधवांसह राज्यातील जनतेचे सशक्तीकरण ही या युतीची प्रमुख दिशा असावी.हिंदुत्व ही केवळ धार्मिक संकल्पना नसून,ती सामाजिक ऐक्याची आणि राष्ट्रीय अस्मितेची जाणीव आहे.ठाकरे बंधूंनी राजकारणापलीकडे जाऊन एकत्र यावे,असा पुनरुच्चार पाटील यांनी केला.
राज आणि उद्धव यांच्यात मतभेदानंतर मनसेचा जन्म झाला.मात्र, हिंदुत्वावर आधारित विचारसरणीत साम्य असल्याने,आगामी महापालिका, जिल्हा परिषद,नगरपरिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही युती राज्याच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवून आणू शकते,असा दावा पाटील यांनी केला.