
no images were found
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने 16 जून ते दि.31 जुलै अखेर अतिसार नियंत्रण मोहिम
कोल्हापूर(प्रतिनिधी): -अर्भक मृत्यूदर व बाल मृत्यूदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. देशात 5 वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण आहे. शासन निर्देशानुसार 0 ते 5 या वयोगटातील बालकांचे अतिसारामुळे होणारे मृत्यू शून्य करणे हे उदिदष्ट समोर ठेवून महानगरपालिकेच्यावतीने शहरात दि.16 जून ते दि.31 जुलै 2025 या कालावधीत Stop diarrhea campaign राबविण्यात येत आहे. हि मोहिम महानगरपालिकेच्या सर्व रूग्णालये, सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्फत राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये सर्व स्टाफ नर्स, ए.एन.एम. व आशा स्वंयसेविकांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यावेळी अतिसाराची लागण झाली तर क्षारसंजीवनी कसे तयार करावे. त्याचा वापर याविषयी समुपदेशन करण्यात येणार आहे.
प्रामुख्याने पाण्यापासून अतिसाराचा सर्वाधिक धोका उद्भवतो. अतिसारामुळे 5 ते 7 टक्के बालके दगावतात. बालकांना त्याची लवकर लागण होऊन जुलाब सुरू होतो. त्यामुळे बालकाच्या शरीरातील पाणी व क्षारांचे प्रमाण कमी होऊ बालकांना खूप अशक्तपणा येतो. अतिसाराबाबत जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना व अतिसारची लक्षणे आढळून आलेल्या बालकांना क्षारसंजीवनी (ओआरएस) व झिंक गोळ्या दिल्या जातात. या औषधांमुळे बालकांच्या स्वास्थ्यामध्ये सुधारणा होऊ शकते. यासाठी महापालिकेची रूग्णालये व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये क्षारसंजीवनी (ओआरएस) कॉर्नर स्थापन करण्यात आलेले आहेत.
तरी शहरातील सर्व नागरीकांनी आपल्या 5 वर्षाच्या आतील बालकांमध्ये अतिसाराची लक्षणे आढळून आल्यास ए.एन.एम, आशा स्वंयसेविका तसेच जवळच्या आरोग्य केंद्रांशी संपर्क साधावा असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.