
no images were found
सारथी कार्यालयाच्या उद्घाटनावरून नाशिकमध्ये नवा वाद
नाशिक : सारथीच्या उद्घाटन पत्रिकेत संभाजीराजे छत्रपती यांना डावललं, असा आरोप मराठा संघटनांनी केला आहे. संभाजी महाराजांना डावलल्यास कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी दिला आहे. येत्या २१ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील विभागीय कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.
मराठा समाजाच्या विविध मागण्या मंजूर व्हाव्यात यासाठी गेल्या काही वर्षांपासून मराठा समाज आणि संभाजीराजे छत्रपती प्रयत्नशील आहेत. यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर काही दिवस उपोषणही केले होते. सारथीचे केंद्र फक्त पुणे येथेच होते. या संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका, वसतिगृहाची सुविधा आणि इतर आवश्यक प्रशिक्षण दिले जात असते. यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांना पुणे येथील सारथीच्या केंद्रात प्रवेश घ्यावा लागत असल्याने विद्यार्थ्यांची मोठी कुचंबना व्हायची. त्यामुळे सारथीचे केंद्र नाशिक येथे व्हावे यासाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार हेमंत गोडसे पाठपुरावा करत होते.
अखेर हे कार्यालय नाशिकमध्ये उभारण्यात आले आहे. मात्र या कार्यालायाच्या उद्घाटन कार्यक्रमात संभाजी महाराजांना डावलल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे सारथी कार्यालयाच्या उद्घाटनापूर्वीच वाद निर्मण झाला आहे. राज्य सरकारने आदेश काढत पंचायत समितीला लागून असलेली जागा सारथी संस्थेला देण्यासाठी मंजुरी दिली होती.
जागेला मंजुरी दिल्यानंतर गोडसे यांनी याविषयीची मूळ फाइल मंत्रालयातून आणत जिल्हा प्रशासनाकडे देत जागा ताब्यात देण्याविषयीची पुढील कार्यवाही तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. महिनाभरापूर्वी जिल्हाधिकारी डी. गंगाधरन यांनी सदर जागेचा ताबा सारथीला देण्याचे प्रशासनाला आदेश दिले होते.
त्यानुसार नाशिकमध्ये विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण केंद्र, अभ्यासिका आणि वसतिगृह उभारण्यासाठी शासनाने आदेशानुसार, प्रस्तावित जागेचा ताबा जिल्हा प्रशासनाने छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेला ( सारथी ) दिला होता. आता त्या ठिकाणी सारथीचे कार्यालय उभारण्यात आले आहे.