
no images were found
‘बायजू’ कंपनीत नोकरकपात होणार
कंपनीकडून सुमारे अडीच हजार कर्मचारी कपातीची शक्यता
भारतातील शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘बायजू’ (Byju’s) येत्या सहा महिन्यात नोकरकपात करणार आहे. मार्च २०२३ पर्यंत तोट्यात असलेल्या कंपनीला नफा कमवून देण्यासाठी जवळपास अडीच हजार कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकण्यात येणार आहे. मार्केटींग तसेच कंपनीचा इतर खर्च कमी करण्यासाठी एकूण ५० हजार कर्मचाऱ्यांपैकी ५% कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे. यासंबंधीची माहिती ‘बायजू’च्या सहसंस्थापक दिव्या गोकुलनाथ यांचेकडून देण्यात आली आहे.
“मार्च २०२३ पर्यंत नफा कमावण्यासाठी आम्ही एक योजना आखली आहे. आम्ही भारतभर ब्रँडबाबत जागरुकता निर्माण केली आहे. येत्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्या भागीदारीतून ब्रँडबाबत जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न असेल. भारतातील आणि परदेशातील व्यवसायासाठी १० हजार शिक्षकांची भरती करण्यात येईल”, अशी माहिती गोकुलनाथ यांनी दिली आहे. ‘बायजू’च्या सहाय्यक कंपन्या ‘मेरीटनॅशन’, ‘ट्युटरविस्टा’, ‘स्कॉलर’ आणि ‘हॅशलर्न’ या भारतातील व्यवसायाचाच भाग असतील. तर ‘आकाश’ आणि ‘ग्रेट लर्निंग’ स्वतंत्र संस्था म्हणून कार्यरत राहतील, असे गोकुलनाथ याच्याकडून सांगण्यात आले आहे. “या नव्या योजनेमुळे कार्यक्षमता वाढून अनावश्यक खर्च टाळण्यास मदत होईल. त्यामुळे भूमिकांचेही सुसूत्रीकरण होईल. आमचे शैक्षणिक मॉडेल ‘बायजू क्लासेस’ आणि अॅप खूप चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. यासाठी शिक्षक भरती करण्यात येईल. या योजनेमुळे महसुलाचे नियोजन करता येईल”, असे गोकुलनाथ यांनी स्पष्टीकरणात सांगितले.