no images were found
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून जिल्ह्यातील 12 हजार 914 शेतकऱ्यांना 88 कोटी 99 लाखांचा लाभ
कोल्हापूर, : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज डिजिटल पद्धतीने कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्याचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच जिल्हाधिकारी विजय राठोड ऑनलाइन उपस्थित होते.
जिल्ह्यातील 12 हजार 914 लाभार्थ्यांच्या खात्यावर एकूण 88 कोटी 99 लाख रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 11 हजार 198 लाभार्थ्यांच्या खात्यावर 73 कोटी 41 लाख रुपये, तर राष्ट्रीयकृत बँकांच्या 1 हजार 716 लाभार्थ्यांच्या खात्यावर 15 कोटी 58 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील 41 हजार 552 पात्र कर्जखाती शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 24 हजार 429 आणि राष्ट्रीयकृत बँकांची 12 हजार 123 कर्जखाती आहेत. शासनाकडून प्राप्त झालेल्या पहिल्या यादीत जिल्ह्यातील 26 हजार 997 पात्र लाभार्थ्यांची नावे आली होती. त्यापैकी 18 हजार 373 लाभार्थ्यांची आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील 8 हजार 624 पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 7 हजार 254 लाभार्थ्यांचा समावेश आहे. आधार प्रमाणीकरण प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांपैकी 2 हजार 13 जणांकडे अॅग्रीस्टॅक क्रमांक नसल्यामुळे त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. ज्या पात्र शेतकऱ्यांनी अद्याप अॅग्रीस्टॅक क्रमांक काढलेला नाही, त्यांनी जवळच्या सुविधा केंद्रात जाऊन अॅग्रीस्टॅक क्रमांक काढून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.
जिल्ह्यातील 1 हजार 564 लाभार्थी शेतकरी मयत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा शेतकऱ्यांच्या वारसांनी महसुली दफ्तरी वारस नोंद करून त्याची पूर्तता संबंधित सेवा संस्था व राष्ट्रीयकृत बँकेत करावी. जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांवर सहकार विभागातील अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 संदर्भात कोणतीही अडचण असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्यातील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी केले आहे.