
no images were found
कपडे धुवायला गेल्या आईसोबत तीन चिमुरड्यांचा तलावात बुडून, अंत; घातपाताचा संशय
सांगली : जिल्ह्यातील बिळूर (ता. जात) येथे तलावाकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तीन लहानग्या मुलींसह आईचा मृतदेह तलावामध्ये आढळून आल्याने या परिसरात मोठी खळबळ उडालीआहे. हा अपघात आहे की घातपात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. या घटनेने जत तालुक्यात शोककळा पसरली आहे.
सुनिता तुकाराम माळी (वय २७), अमृता तुकाराम माळी (वय १३), अंकिता तुकाराम माळी (वय १०), ऐश्वर्या तुकाराम माळी (वय ७) अशी मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. ही घटना सोमवारी रात्री १ वाजता निदर्शनास आली. रात्री उशीरा या चौघींचेही मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आले. पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जत तालुक्यातील बिळुर येथील सुनीता माळी या कपडे धुण्यासाठी मुलींसह गावाजवळील तलाव परिसरात गेल्या होत्या. तुकाराम चंद्रकांत माळी हे गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या सुतार फाटा जवळ राहतात. घराजवळच त्यांची शेती असून लगतच लिंगनूर तलाव आहे.
रविवारी सकाळपासून त्यांची पत्नी सुनीता व तीन मुली बेपत्ता होत्या. दिवसभर शोधाशोध करूनही चौघीही सापडल्या नाहीत. त्यांनी सासरवाडी कोहळी (ता. अथणी) येथेही विचारणा केली. त्यानंतर त्यांनी जत पोलिसांत बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. पोलीस, ग्रामस्थ व नातेवाईक यांनी शोधाशोध केल्यानंतर तलावात चौघींचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. सोमवारी रात्री एक वाजता चौघींचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेबद्दल बिळुर भागात उलट सुलट चर्चा सुरू होती. तपास जत पोलीस करत आहेत.