
no images were found
बस –कंटेनर अपघातात बस जळून 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
खाजगी प्रवाशांची वाहतूक करणार्या ट्रॅव्हल्स व टँकरमध्ये झालेल्या धडकेने खाजगी लक्झरी बस पेटल्याने साखर झोपेत असलेल्या 11 प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला तर 28 प्रवासी जखमी झाले. हा भीषण अपघात नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील नांदूरनाका येथे शनिवारी पहाटे सव्वापाच वाजता घडला. दरम्यान, अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी दोन लाखांची मदत जाहीर केली असून जखमींवर शासकीय खर्चातून उपचाराची घोषणाही केली आहे.
नाशिक: शनिवारी पहाटे 4.30 ते 5 च्या सुमारास औरंगाबादकडून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगात चिंतामणी ट्रॅव्हल्स व अमृतधाम चौफुलीकडून टाकळी रोडच्या दिशेने वेगात येणारा कोळशाने भरलेला आयशर ट्रक या दोन वाहनांची मिरची हॉटेल समोरील चौफुलीवर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की बसने आयशर ट्रकला सुमारे 500 ते 600 मीटर फरफटत नेले. बसच्या धडकेत आयशर ट्रकचा डिझेल टॅंक फुटल्याने पेट घेतला आणि त्यानंतर काही क्षणात बस पेटली. अपघातग्रस्त दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला असलेल्या छोटा हत्ती वाहनावर जाऊन धडकले. या अपघातात बस चालक जागेवरच ठार झाला आहे. तब्बल 12 प्रवाशांचा या भीषण दुर्घटनेत जिवंत होरपळल्यामुळे मृत्यू झाला आहे.
यवतमाळकडून चिंतामणी ट्रॅव्हल्स कंपनीची बस आली अन् जळगावकडून कंटेनर…. या दोन्ही वहानांत झालेल्या धडकेमुळे खासगी बसने पेट घेतला व बस पूर्णपणे जळाली. सुरूवातीला बसच्या डिझेल टाकीने पेट घेतला आणि गाडीचे पूर्ण फर्निचर जळून खाक झाले. मागील बाजूने लोक उतरत होते, सर्व लोक पेटलेल्या अवस्थेत सैरावैरा पळत होते. काही लोकांचा आमच्या डोळ्यादेखत पूर्णपणे कोळसा झाला. बसपासून 50 फूटावर असलेला बोर्डसुद्धा आगीच्या दाहकतेने जळाला, अनेक लोकं तरफडत पडली होती, कुणाच्या किंचाळ्या ऐकायला येत होत्या तर लहान मुले रडत होती. पण आम्ही काही करू शकलो नाही. अग्निशामक दल येथून एक किलोमीटर लांब असल्यामुळे त्यांना यायला अर्धा तास उशीर झाला. जर लवकर अग्निशामक दल पोहोचले असते तर आणखीन लोकांचे प्राण वाचले असते; अशी भावना अपघातस्थळी प्रत्यक्षदर्शी असलेल्या स्थानिक लोकांनी व्यक्त केली.
‘अतिशय भयंकर अपघात होता. मामा आणि काका सोबत जात असताना गाडीला अपघात झाला. आम्ही खिडकीतून उड्या घेतल्या. आम्ही लोक कल्याणला जात होतो. मामा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून माझी प्रकृती ठीक आहे. अतिशय भयंकर अपघातातून आम्ही वाचलो हेच सुदैव,’ असं पिराजी सुभाष धोत्रे (रा. अरणी, यवतमाळ) यांनी सांगितले.
अपघातावेळी बसमध्ये एकूण 36 प्रवासी होते बसमध्ये अपघातानंतर लागलेल्या आगीत काही प्रवासी होरपळ्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. सुमारे 12 प्रवासी या भीषण दुर्घटनेत जिवंत होरपळले आणि त्यांचा मृत्यू झालाय. तर एक प्रवासी गंभीर जखमी आहे. बसमधील बाकीचे प्रवासी किरकोळ जखमी आहेत. जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयातून दुसरीकडे उपचारांसाठी हलवण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाधरन डी यांनी दिली. याबाबतचा अधिक तपास सुरु आहे.