
no images were found
कागल येथे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित आयुर्वेद रुग्णालयास मंत्रिमंडळाची मंजुरी
मुंबई : जिल्ह्यातील कागल येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित १०० रुग्णखाटांच्या आयुर्वेद रुग्णालयास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याने मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.
आयुर्वेदाचा पायाभूत सिध्दांत स्वास्थस्य स्वास्थ्य रक्षणम् साध्य करण्यासाठी राज्यातील आरोग्य सेवेतील आयुर्वेद तज्ज्ञांची आवश्यकता लक्षात घेऊन कागल येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित १०० रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालय स्थापन करण्याची आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
केंद्र शासनाच्या व भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग नवी दिल्ली यांच्या मान्यतेच्या अधीन राहून कागल येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्न १०० रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालय स्थापन करण्यास शासनाने मान्यता देण्यात आली असल्याचे पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
महसूल विभागाच्या सहमतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निकषानुसार आवश्यक जागा उपलब्ध करुन घेण्यात येऊन त्या जागेत नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
या महाविद्यालयासाठी विविध संवर्गातील पदे अंदाजपत्रकीय तरतूद करुन विहित मार्गाने निर्माण करण्यास व भरण्यास परवानगी देण्यात आली. तसेच या महाविद्यालयांशी संलग्नित अनुषंगिक आयुर्वेद रुग्णालयासाठी विविध संवर्गातील पदे अंदाजपत्रकीय तरतूद करुन विहित मार्गाने निर्माण करण्यास व भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. या महाविद्यालय व अनुषंगिक रुग्णालयांसाठी आवश्यक तसेच अतिरिक्त बांधकाम करण्यास व खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या आरोग्य विषयक धोरणाचा भाग म्हणून आधुनिक वैद्यक शास्त्राव्यतिरिक्त भारतीय चिकित्सा पद्धतीसोबत इतर चिकित्सा पद्धतीचा प्रचार, प्रसार करण्याकरीता स्वतंत्र आयुष (आयुर्वेद, योगा, युनानी, सिध्द, होमिओपॅथी) मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. जनतेला आरोग्य सेवा अत्यंत प्रभावी व परिणामकारकपणे देण्यासाठी आयुष मंत्रालय कार्य करत आहे. राज्यातील वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग देखील या कार्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याअंतर्गत आयुर्वेद महाविद्यालयामार्फत दर्जेदार आयुर्वेद शिक्षण घेवून आयुर्वेद पदवीधर समाजात येत आहेत व समाजाचे आरोग्य सुदृढ राहाण्यासाठी सेवा प्रदान करत आहेत.