
no images were found
कोल्हापुरात विकसित भारत संकल्प यात्रा अंतिम टप्प्यात
कोल्हापूर, : विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन केंद्र शासनाकडून ग्रामीण तसेच शहरी भागात केले जात आहे. शासकीय योजनांचे लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी जिल्हयात विकसित भारत संकल्प यात्रे अंतर्गत गावोगावी योजना देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रभारी अधिकारी म्हणून केंद्रीय सहसचिव कार्पोरेट व्यवहार मंत्रालय, भारत सरकार अनीता शाह अकेल्ला यांची नियुक्ती झाली आहे, त्यांनी शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे येथे सुरू असलेल्या संकल्प यात्रेला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते प्रसिध्दी रथाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उपस्थितांना २०२४ च्या दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले. कृषी विभागांतर्गत औषध फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक ड्रोनचे प्रात्यक्षिकही करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकरी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसिलदार रामलिंग चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, गट विकास अधिकारी सोनाली मडकर, नायब तहसिलदार गणेश लव्हे, सरपंच भगतसिंग चौगुले यांचेसह गावातील लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनिता शाह यांनी कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या शासकीय योजनांच्या प्रत्येक स्टॉलला भेट देऊन माहिती जाणून घेतली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने श्रीमती अकेल्ला यांचा ग्रामदैवताची प्रतिमा देऊन विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी उपस्थित लाभार्थी यांनी शासकीय योजना मिळाल्यानंतर झालेल्या बदलांबाबत आपले अनुभव सांगितले. बांबवडे येथील आयोजित कार्यक्रमात पात्र लाभार्थ्यांना सहसचिव अनिता शाह अकेल्ला यांचे हस्ते विविध योजनांचे लाभ वितरित करण्यात आले. यात उज्ज्वला भारत गॅस, रमाई व प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, आयुष्यमान भारत कार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना व प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा समावेश होता.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, आयुष्यमान भारत कार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेबाबत उपस्थितांना माहिती दिली. ते म्हणाले, बांबवडे गावत संकल्प यात्रेला मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना राबवीत असताना काहींना लवकर लाभ मिळतो तर काहींना उशिरा. यासाठीच प्रसिध्दीसह उर्वरित लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी ही यात्रा आपल्या गावत आली आहे. शासन आता आपल्या दारात योजना घेऊन येत आहे हा आजच्या काळातील प्रमुख बदल असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शेवटी उपस्थितांना विकसित भारत ची शपथ देण्यात आली.