
no images were found
शिवाजी विद्यापीठाच्या क्रांतीवन सुशोभीकरणाचे उद्घाटन
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या क्रांतीवन परिसराच्या सुशोभीकरणाचे आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आज क्रांतीदिनानिमित्त शहीद क्रांतीकारकांना क्रांतीवनातील स्मृतीस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून कुलगुरू डॉ. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी अभिवादन केले. त्यानंतर सदर नूतनीकृत क्रांतीवनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. लवकरच हे क्रांतीवन ज्येष्ठ नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या क्रमांक आठ प्रवेशद्वारासमोरील भागात क्रांतीवन आहे. या ठिकाणी कोल्हापूर, सांगली व सातारा आणि सोलापूर (सन २००३ पर्यंत) जिल्ह्यांतील शहीदांचे स्मृतीफलक आहेत. या क्रांतीवन परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामास २० मे २०२३ रोजी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी सदर सुशोभीकरणाचे काम क्रांतीदिनापर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आज या नूतनीकृत क्रांतीवनाचे कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
सदर नूतनीकृत क्रांतीवनामध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविलेला सुमारे ५०० मीटरचा प्रशस्त वॉकिंग ट्रॅक बनविण्यात आला आहे. उद्यानात पारसदृश बैठक व्यवस्था करण्यात आली असून योगासनांसाठी मंच उभारला आहे. सुशोभीकरणासाठी सौरदिवे, आसनव्यवस्था यासाठी बँक, उद्योगांकडून भरीव देणगी प्राप्त झाली आहे. शहीदांच्या नामफलकांचे आणि ‘अनाम वीरा…’ कवितेच्या फलकाचेही नूतनीकरण करण्यात आले आहे. संरक्षक भिंतीची दुरुस्ती व रंगकामही करण्यात आले आहे. उद्यानामध्ये आधीपासूनच असलेल्या चाफा, कडुनिंब, आवळा, वड, चिंच, शिरीष या झाडांच्या जोडीला सोनचाफा, कांचन, जांभूळ आदी रोपेही लावण्यात आली आहेत. उद्यान अधिकाधिक आकर्षक करण्याच्या दृष्टीने विविध फुलझाडेही लावण्यात आली आहेत. या परिसरात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश देण्यात येणार असून येथे फिरावयास येणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठास प्रसन्न वाटावे आणि विद्यार्थ्यांच्याही मनात शहीदांप्रती कृतज्ञभाव निर्माण व्हावा, या दृष्टीने या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.
कोल्हापूरच्या जनतेच्या वतीने ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांना राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम नाशिक येथे झाला. त्यावेळी शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. द.ना. धनागरे उपस्थित होते. त्या प्रसंगी कुसुमाग्रजांनी, प्रत्येक विद्यापीठामध्ये त्या त्या परिक्षेत्रातील शहीदांची नावे असणारे एक स्मृतीस्थळ विकसित करण्याची सूचना केली होती. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात स्वातंत्र्यसैनिकांच्या तसेच युद्धात शहीद झालेल्या आपल्या भागातील सैनिकांच्या स्मृती जागृत राहतील आणि त्यांना देशकार्यासाठी प्रेरित करीत राहतील, अशी त्यांची भावना होती. त्यांच्या सूचनेनुसार सन २०००मध्ये शिवाजी विद्यापीठात क्रांतीवनाची निर्मिती करण्यात आली. क्रांतीसिंह नाना पाटील व कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना ते अर्पित आहे. कुसुमाग्रजांची ‘अनाम वीरा…’ या कवितेचा फलक स्मृतीस्थळी उभारण्यात आला. या सुमारे २ एकर परिसराचे सुशोभीकरण विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.