
no images were found
राज्यातील सर्व्हर अद्यावत करा : भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
कोल्हापूर : अनेक दिवसांपासून सेतू सुविधा केंद्रांतील सर्व्हर डाऊन आहेत. परिणामी इथे विविध कामांनिमित्त येणाऱ्यांची सध्या मोठी गैरसोय होत असून, त्यांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे. यामध्ये नुकतीच परीक्षा पास होऊन कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याच्या प्रक्रियेतील विद्यार्थी व पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.
याविषयात आज भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना ईमेल द्वारे निवेदन सादर केले.
सर्व्हर डाऊन असल्याने प्रमाणपत्र किंवा दाखला देण्यात अडचणी येत आहेत. एक प्रमाणपत्र किंवा दाखला घेण्यासाठी बराच वेळ लागत असल्याने लांबच लांब रागा लागत आहेत. परिणामी या केंद्रांवर गोंधळाचे वातावरण आहे.
सध्या शाळा-कॉलेजांची प्रवेशप्रक्रिया सुरू आहेत. कॉलेजच्या प्रवेशासाठी अधिवास प्रमाणपत्र लागते. उत्पन्नाचा दाखला, कॉलेज प्रवेश प्रक्रिया यासाठी विद्यार्थी व पालक सेतू केंद्रांवर रोज हेलपाटे मारत आहेत. पण सर्व्हर डाऊन असल्याचे कारण देत त्यांना परत पाठवले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. दरवर्षी सर्व्हर डाऊनमुळे फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येते परंतु याबाबत कायमचा तोडगा अद्याप निघत नाही.
आज ईमेल द्वारे मागणी करण्यात आली की, विद्यार्थी, पालक तसेच सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक अशा ई सुविधा तात्काळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व्हर अद्यावत करून नागरिकांना दिलासा द्यावा.