
no images were found
पंचगंगेचे शुद्धीकरण करण्याचा संकल्प सर्वांनी करावा : उद्योग मंत्री सामंत
कोल्हापूर : कोल्हापूरच्या पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहेच. पंचगंगेचे शुद्धीकरण करण्याचा संकल्प सर्वांनी करावा, उद्योजकांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर पर्यावरण रक्षणासाठी करावा असे आवाहन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. कणेरी मठ येथील ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवा’निमित्त उद्योजकांसाठी आयोजित विशेष परिषदेत ते बोलत होते.
यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले, उद्योगधंदे वाढले पाहिजेत, पण उद्योग निर्मितीनंतर त्याचे दुष्परिणाम समाजातील अन्य घटकांवर होवू नयेत, यासाठी उद्योजकांनी स्वत: आचारसंहिता घालून घ्यावी. तीस दिवसांत उद्योगांसाठी परवाना देणारा कायदा येत असल्यामुळे उद्योगवाढीला गती मिळेल. परंतू, उद्योगधंद्यांमुळे प्रदूषण होणार नाही, याची काळजी उद्योजकांनी घ्यायला हवी. भविष्यात जे काही करता येईल, ते पर्यावरणासाठी उपयुक्त असेल, अशी खूणगाठ उद्योजकांनी बांधावी. पर्यावरणपूरक कामाचा संकल्प करावा, यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल,
भारतीय आयुर्वेदात मोठमोठ्या आजारांवर मात करण्याची ताकद असून त्याचा प्रसार विदेशात करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे बीव्हीजी चे हणमंतराव गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रीय हरीत लवादाचे अध्यक्ष ए. के. गोयल, उत्तर प्रदेशचे आमदार सी.पी. चंद, बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, ट्रान्सग्नायझेशनचे संस्थापक रोहित अरोरा, अभिनेते संदीप कुलकर्णी, कागल औद्योगिक वसाहतीचे हरिश्चंद्र धोत्रे, पंजाबचे ओमेंद्र दत्त, सॅटर्डे क्लबचे नितीन देशपांडे, मठाचे विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील तसेच विविध उद्योग संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.