no images were found
…मग देशात गोमांस खाण्यावरून लोकांच्या हत्या का घडवल्या? शिवसेनेचा भाजपाला सवाल
मुंबई : जर गोमांस खाणाऱ्यांसाठी संघाचे दरवाजे उघडे असतील तर मग देशात गोमांसावरून देशात हत्या का घडवून आणल्या? असा प्रश्न शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून विचारण्यात आला आहे.
कोणी मजबुरीने गोमांस खाल्ले असले तरी त्यांच्यासाठी संघाचे दार बंद नाही. आजही त्यांची घरवापसी होऊ शकते, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक दत्तात्रेय होसबळे यांनी जयपूरमधील एका कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या विधानावरून शिवसेनेनं भाजपावर टीकास्र सोडलं आहे “संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी १५ दिवसांपूर्वीच जयपुरात एक खळबळजनक विधान केले., ‘‘गोमांस खाणाऱ्यांनाही संघाचे दरवाजे उघडे आहेत.’’ म्हणजे गाईंना खाटीकखान्यात न्यायची परवानगीच संघाने दिली व इकडे मोदी सरकारने ‘काऊ हग डे’ म्हणजे गाईस मिठी मारण्याचे फर्मान सोडले. गोमांस खाणाऱ्यांना संघाचे दरवाजे उघडे असतील तर मग गोमांस खाण्यावरून लोकांच्या हत्या का घडवल्या?” असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे.
“या वर्षी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहेत. त्यासाठी जनतेकडे मते मागताना सांगण्यासारखे काहीच नसल्याने मोदी सरकार देशाला पुन्हा धर्म आणि भावनिक मुद्द्यांवर गुंतवीत आहे”, असेही शिवसेनेनं म्हटलं आहे.