
no images were found
पत्नीच्या विरहात व्याकुळ झालेल्या पतीनेही प्राण सोडले
जळगाव : लग्न म्हणजे जन्मोजन्मीच्या रेशीमगाठी, असं म्हटलं जातं. याचा प्रत्यय जळगावातील मेहरुन परिसरातील घटनेवरून आला. पत्नीच्या विरहात व्याकुळ झालेल्या पतीनेही प्राण सोडले. पत्नीच्या तेराव्याचा कार्यक्रम संपल्यानंतर काही मिनिटांतच पतीचाही मृत्यू झाला.
जळगाव मेहरूण परिसरातील भवानी नगर येथील वाय. डी. पाटील शाळेसमोर राहणाऱ्या शकुंतलाबाई श्रीराम बोडखे (वय ७५ वर्ष) यांचे ८ जानेवारी रोजी निधन झाले. रात्री अकरा वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या गंधमुक्ती व तेरावीचा कार्यक्रम शुक्रवार २० जानेवारी रोजी पार पडला. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर शकुंतलाबाई यांचे पती श्रीराम भिमराव बोडखे (वय ७८ वर्ष) यांनी देखील जीव सोडला. पत्नी शंकुतलाबाई यांचा विरह त्यांचा सहन झाला नाही, यातून शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास श्रीराम बोडखे यांची प्राणज्योत मालवली.
सकाळपासूनच त्यांची तब्येत थोडी खराब होती. सर्वांशी चांगले रहा, सचोटीने राहा, असे ते घरातील सर्वांना सांगत होते असल्याचे मुलगा ताराचंद बारी व अनिल बारी यांनी सांगितले. मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील पानवडोद येथील असलेले बोडखे दाम्पत्य कामानिमित्त काही वर्षांपासून जळगावला स्थायिक झाले होते. मयत श्रीराम बोडखे यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ताराचंद बारी हा रिक्षा चालक आहे तर अनिल बारी हे कंपनीत नोकरीला आहेत.