no images were found
डॉ. महाजन यांच्या निधनामुळे शिवाजी विद्यापीठाची मोठी हानी: कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक तथा ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीकृष्ण तथा एस.एस. महाजन यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शिवाजी विद्यापीठाची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
कुलगुरू डॉ. गोसावी यांनी म्हटले आहे की, डॉ. महाजन यांनी विद्यापीठास मोलाचे शैक्षणिक व संशोधकीय योगदान दिले. विविध महत्त्वाच्या पदांवर आणि समित्यांवर काम करीत असताना प्रशासकीय पातळीवरही त्यांनी बजावलेली कामगिरी अविस्मरणीय ठरली. विद्यापीठाचे विद्यार्थी ते अधिष्ठाता असा त्यांचा प्रवास झाला. त्यांच्या मनात विद्यापीठाविषयी सदैव कृतज्ञभाव होता. ते एक विद्वान प्राध्यापक होतेच, पण सहृदय माणूसही होते. त्यांच्या निधनामुळे झालेली हानी कधीही न भरून येणारी आहे.
शांत, सुस्वभावी सहकारी गमावल्याचे दुःख: प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव श्रीकृष्ण महाजन यांच्या निधनामुळे शांत, सुस्वभावी आणि विद्वान सहकारी अकाली गमावल्याचे मोठे दुःख वाटत आहे, अशा शोकभावना शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी व्यक्त केल्या आहेत.
डॉ. महाजन यांच्यासमवेत अनेक शैक्षणिक, प्रशासकीय समित्यांवर काम करण्याची संधी मिळाली. आपले म्हणणे अत्यंत शांतपणे मुद्देसूद आणि नेमकेपणाने मांडण्याची त्यांची शैली प्रभावी होती. विविध विषयांवरील त्यांचे प्रभुत्व, आकलन हे खूप उच्च दर्जाचे होते. त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला वेळोवेळी केलेले मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. असा विद्वान सहकारी अकाली गेल्याने विद्यापीठाचे मोठे नुकसान झाले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.