
no images were found
अंगणवाडी सेविका २० हजार पदांची भरती; १२वी उत्तीर्णची अट
सोलापूर : राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील १ लाख १० हजार अंगणवाड्यांमध्ये आता २० हजार अंगणवाडीसेविका पदांची भरती केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या ‘पोषण २.०’अंतर्गत आता पदभरतीसाठी बारावी उत्तीर्ण महिलांनाच संधी मिळेल. मदतनीस पदासाठी ७ उत्तीर्णची अट कायम राहणार असून ही भरती प्रक्रिया २६ जानेवारीनंतर सुरू होईल.
यापूर्वी अंगणवाडी सेविका होण्यासाठी दहावी उत्तीर्ण अशी अट होती. परंतु, अंगणवाड्यांमधील ७५ लाख विद्यार्थ्यांची दररोज ‘पोषण ट्रॅकर’ ॲपद्वारे माहिती भरताना अनेक अडचणी निर्माण होत असल्यामुळे आता सेविकांच्या पदासाठी १२वी उत्तीर्ण असणे बंधनकारक असेल. त्यासंबंधीचा शासन निर्णय झाल्यानंतर भरती प्रक्रियेला सुरवात होणार आहे. ३० जानेवारीपूर्वी मदतनीस महिलांना शैक्षणिक पात्रतेनुसार सेविकापदी पदोन्नती दिली जाणार आहे.
यानंतर इतर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागणी, त्यांची यादी प्रसिद्ध करणे आणि त्यावर हरकती मागविण्यासाठी किमान २० ते २५ दिवस लागतील. विधवा, जातसंवर्ग, पूर्वीचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता, यावरून संबंधित पात्र उमेदवारांची थेट निवड करण्यात येणार आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी म्हणजेच मे २०२३ पूर्वी अंगणवाड्यांमधील २० हजार पदांची भरती करण्यात येईल, अशी माहिती एकात्मिक बाल विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.