
no images were found
तोट्यात असूनही केएमटीची गावकी आमच्या पैशातून कशासाठी?
कोल्हापूर : प्रचंड तोट्यात असूनही केएमटी विविध ग्रामीण मार्गांवरून धावत असल्याने केएमटीचा मुद्दा पुन्हा तापला आहे. केएमटी अधिकारी आणि शहरातील साामाजिक संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीत केएमटीने केलेल्या सर्वेक्षणाची माहिती दिली, तर आतापर्यंत किती तोटा झाला आहे याची माहिती दिली.
ॲड. बाबा इंदूलकर यांनी केएमटीच्या २४ पैकी २२ मार्गांवर प्रचंड तोटा असतानाही चालवली जात असल्याने संताप व्यक्त केला. बाबा इंदूलकर म्हणाले, १ जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये केएमटीच्या २४ मार्गांमुळे १४ कोटींचे नुकसान झाले आहे. असे असतानाही कोल्हापूर शहारातील जनतेच्या कररुपातील ११ कोटी ३७ लाख रुपये केएमटीसाठी महापालिकेकडून वर्ग करण्यात आले. हा पैसा विकासकामांसाठी होता तो त्यासाठी वापरता आला असता. केएमटीचे २४ पैकी २२ रुट हे ग्रामीण भागातील असून जे तोट्यातील आहेत.
बाबा इंदूलकर पुढे म्हणाले, कोल्हापूर शहरासाठी बससेवा असावी असा शासकीय आदेश आहे. मात्र, नेत्यांना खुश ठेवण्यासाठी ग्रामीण भागात बससेवा चालवतं, त्याचा त्रास शहरातील सर्वसामान्य जनतेला होत आहे. नवीन रस्ते सोडा, खड्डे भरण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून डांबर खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने काम थांबवण्यात आलं आहे. डांबर आणण्यासाठी पैसे नाहीत, आणि गावकी आमच्या पैशावर चालवतात. हा सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय आहे. जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंते हे युद्ध सुरु राहणार, वेळप्रसंगी हे पैसे अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागली तरी चढू.
दरम्यान, केएमटीकडून शहर तसेच ग्रामीण भागामधील तोट्यातील प्रत्येक मार्गावरील फेऱ्यांचे सर्वेक्षण केले. कंदलगाव, पेठवडगाव, कळंबा, कागल, कुडित्रे या पाच मार्गांवर तब्बल १९ फेऱ्या प्रचंड तोट्यात आहेत. त्यामुळे त्या मार्गांवरील बससेवा बंद करण्यासाठीचा प्रस्ताव प्रशासक व अतिरिक्त आयुक्तांकडे पाठवल्याची माहिती केएमटीच्या अतिरिक्त परिवहन आयुक्त टिना गवळी यांनी बैठकीत दिली.