
no images were found
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दोघांना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
अहमदनगर : एका अल्पवयीन मुलीस पळवून आणून करणाऱ्या दोघांना दहा वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली.
हिंगोलीतील नीलेश सुनील उमाप (वय ३४) आणि महिला माया रमेश आगलावे (वय ४०, दोघे मूळ रा. इंदिरानगर, कळमनुरी, जि. हिंगोली, सध्या रा. शिवाजीनगर, निंबळक, ता. नगर) या दोघा आरोपींनी हिंगोली येथून अल्पवयीन मुलीस पळवून आणून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी या दोघांना दहा वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी मोरे यांनी ठोठावली. विशेष सरकारी वकील अॅड. मनिषा केळगंद्रे-शिंदे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
ही पीडित मुलगी आपल्या सावत्र आईबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये राहात होती. मुलीला या सावत्र आईकडून पीडितेस सतत मारहाण होत होती. या कारणामुळे सावत्र आईसोबत मुलीचे वाद झाल्यानंतर मुलगी गावातील मंदिरात जाऊन बसली असताना मुलीची ओळख माया आगलावे हिच्याबरोबर झाली. आगलावे ही आईला समजावून सांगण्याच्या बहाण्याने मुलीस अहमदनगरला घेऊन आली. आरोपी नीलेश उमाप याच्या मदतीने जबरदस्तीने दुचाकीवर बसवून शिवाजीनगर, निंबळक येथे तिला आणण्यात आले. नीलेश याने तिच्यावर बळजबरीने वेळोवेळी अत्याचार केला. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यावर दोघांनी बळजबरीने गर्भपात केला. फेब्रुवारी २०२१ मध्ये पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध फिर्याद दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक दीपक पाठक यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे ६ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित मुलगी, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. मुलीवर अत्याचार होत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी एम.आय.डी.सी. पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी मुलीची आरोपींच्या ताब्यातून सुटका केली. त्यानंतर बालकल्याण समितीकडे मुलीचा ताबा देण्यात आला. समितीच्या सदस्यांनी पीडित मुलीची चौकशी करून समितीच्या सदस्यांनी आरोपींविरुद्ध फिर्याद दाखल केली. दोघा आरोपींना दहा वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली.