no images were found
केंद्राच्या अनेक निर्णयांतून साखर कारखानदारीला नवसंजीवनी
कोल्हापूर, : पश्चिम महाराष्ट्रातील सहकार आणि साखर उद्योगाला नवे बळ देणारी महत्त्वपूर्ण घोषणा करत केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या दोन मोठ्या प्रकल्पांची घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1,500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प, तर पुण्यातील बंद पडलेले नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. इचलकरंजी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे टेक्सटाईल पार्कमध्ये आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, नगर विकास राज्य मंत्री तथा कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार धैर्यशील माने आणि धनंजय महाडिक, आमदार सर्वश्री राहुल आवाडे, शिवाजी पाटील, अशोक माने, रवींद्र चव्हाण आणि राजेंद्र पाटील यड्रावकर, महापौर उदय धातुंडे, माजी खासदार कल्लापण्णा आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे आणि आवाडे परिवार आदि उपस्थित होते.
साखर कारखानदारीला नवसंजीवनी देणारे निर्णय
अमित शहा म्हणाले की, सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतर केंद्र सरकारने साखर उद्योगाला स्थैर्य देण्यासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. साखर कारखान्यांवरील सुमारे 46 हजार कोटी रुपयांचा प्राप्तीकर माफ करण्यात आला असून, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळामार्फत (NCDC) 10 हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढविणे, मल्टीफीड इथेनॉल प्रकल्पांना प्रोत्साहन देणे आणि इथेनॉलवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करणे यांसारख्या निर्णयांमुळे साखर कारखानदारीला नवसंजीवनी मिळाली आहे. बंद पडलेल्या साखर कारखान्यांना पुन्हा कार्यान्वित करण्याबरोबरच उद्योगाला साखरेपलीकडे इथेनॉल, सीबीजी आणि इतर मूल्यवर्धित उत्पादनांकडे वळविण्याचे धोरण राबविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.