Home मनोरंजन लोकप्रिय अभिनेत्री अनघा अतुलची होणार एण्ट्री

लोकप्रिय अभिनेत्री अनघा अतुलची होणार एण्ट्री

9 second read
0
0
13

no images were found

लोकप्रिय अभिनेत्री अनघा अतुलची होणार एण्ट्री

स्टार प्रवाहवरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत सध्या जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यातील अत्यंत भावनिक टप्पा प्रेक्षक अनुभवत आहेत. एकीकडे काव्या आणि पार्थच्या आयुष्यात बाळाच्या आगमनाची चाहूल लागलेली असतानाच दुसरीकडे नंदिनी मातृत्वाच्या अपूर्ण स्वप्नाशी झुंज देत आहे. आई होण्याची तीव्र ओढ, त्यासाठी केलेले प्रयत्न आणि प्रत्येक वेळी पदरी पडलेली निराशा यामुळे जीवा-नंदिनीचा प्रवास अधिकच भावनिक बनला आहे.

       अखेर वैद्यकीय सल्ल्यानंतर जीवा आणि नंदिनीने सरोगसीचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या महत्त्वाच्या प्रवासात साथ देण्यासाठी मालिकेत एका नव्या व्यक्तिरेखेची एण्ट्री होणार आहे. लोकप्रिय अभिनेत्री अनघा अतुल डॉ. आर्या या भूमिकेतून मालिकेत दाखल होत आहे. तिच्या आगमनामुळे कथानकाला एक महत्त्वपूर्ण कलाटणी मिळणार असून प्रेक्षकांना अनेक भावनिक आणि अनपेक्षित वळणं अनुभवायला मिळणार आहेत.

     रंग माझा वेगळा मालिकेतील श्वेता या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अनघा जवळपास तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाह कुटुंबात परतत आहे. या भूमिकेबद्दल सांगताना अनघा अतुल म्हणाली, ‘स्टार प्रवाहसोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाल्याचा खूप आनंद आहे. रंग माझा वेगळामध्ये खलनायिका साकारल्यानंतर ठरवून सकारात्मक भूमिकेची वाट पहात होते. डॉ. आर्याच्या रुपात तो शोध संपला असं म्हणेन. डॉ. आर्या ही अतिशय संवेदनशील, समजूतदार आणि सकारात्मक व्यक्तिरेखा आहे. जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर ती त्यांच्या सोबत उभी राहणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ट्रेनने प्रवास करताना मोबाईलवर मालिका पहाणाऱ्या असंख्य स्त्रिया मी पाहिल्या आहेत. मी सुद्धा ही मालिका आवर्जून पहाते. आपल्याच आवडीच्या मालिकेत काम करायला मिळणं हा दुग्धशर्करा योग आहे असं मला वाटतं. या भूमिकेमध्ये भावनांची खूप सुंदर गुंफण आहे. प्रेक्षकांनी माझ्या आधीच्या भूमिकांवर भरभरून प्रेम केलं, तसंच प्रेम डॉ. आर्यालाही मिळेल अशी आशा आहे.’

      जीवा-नंदिनीचं मातृत्वाचं स्वप्न पूर्ण होणार का? डॉ. आर्याच्या आगमनामुळे त्यांच्या आयुष्यात नेमके कोणते बदल घडणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम, दररोज सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

बिरसा मुंडा यांचे बलिदान  स्वाभिमानाची प्रेरणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बिरसा मुंडा यांचे बलिदान  स्वाभिमानाची प्रेरणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणव…