no images were found
आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त अंबाबाई दर्शन: कीर्तन, प्रवचन, गायनात भक्त तल्लीन
कोल्हापूर,: – आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त सुरू असलेल्या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी आज करवीर निवासिनी अंबाबाईची विधिवत पूजा करून दर्शन घेतले.
येथील श्रीमद जगदगुरू आद्य शंकराचार्यांचा २५३४ वा जयंती उत्सव येथील पीठामध्ये २६ एप्रिल ते १ मे २०२६ या कालावधीत आयोजित केला आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये नित्य कार्यक्रमाबरोबर स्वरार्चन मंच (डॉक्टर मैत्रिणी) यांचे कीर्तन सायंकाळी पाच वाजता झाले. रात्री आठ वाजता डॉ. रवींद्र घांघुर्डे व डॉ. वंदना घांघुर्डे, रा. पुणे यांच्या गायनालाही भक्तांनी प्रतिसाद दिला.
दरम्यान, ३० एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता पुरस्कार वितरण होईल. यामध्ये वैदिक पुरस्कार वे.शा.सं. मंदार महेश पुजारी (नृसिंहवाडी), सांस्कृतिक पुरस्कार वे.शा.सं. डॉ. सीताराम नारायण जोशी (परभणी), कीर्तनकार पुरस्कार हभप रामचंद्रबुवा प्रभाकर भिडे (पुणे), स्थानिक वैदिक पुरस्कार वे.शा.सं योगेश मुरलीधर खरे (कोल्हापूर), सामाजिक गौरव डॉ. हेमंत विंझे (मुंबई), महिला कीर्तनकार हभप सौ. वर्षा वसंत बेडेकर (नागपूर), होतकरू विद्यार्थी वेदांत कुमार जोशी (नांदेड), चिन्मय बाळकृष्ण कुलकर्णी (जालना), उत्कृष्ट शासकीय कर्मचारी विजय जोशी (पुणे), विशेष गौरव पंडित पराग चौधरी (संभाजीनगर) यांना शाल, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात येईल. १ मे रोजी महाप्रसाद व पालखी प्रदक्षिणाने उत्सवाची सांगता होईल. यावेळी पीठामध्ये दुपारी ४ वाजता पालखीचे पूजन होऊन शहराच्या प्रमुख मार्गावरून पालखी लवाजमासह करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनास जाईल. तेथून पुन्हा पीठात येईल.