no images were found
ऐतिहासिक माणगाव परिषदेचा १०६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा होणार – जिल्हाधिकारी अमोल येडगे
माणगाव येथे २१ व २२ मार्च रोजी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन
कोल्हापूर, : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने आणि विचाराने ऐतिहासिक सन्मानभूमी माणगाव नगरी येथे संपन्न झालेल्या दक्षिण महाराष्ट्रातील पहिल्या बहिष्कृत परिषदेस यावर्षी १०६ वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक दिनाचे महत्त्व विचारात घेऊन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत जिल्हास्तरीय माणगाव स्मारक समिती सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, बौद्ध समाजाचे पदाधिकारी व नागरिक यांचे उपस्थितीत आयोजनाबाबत बैठक संपन्न झाली.
या बैठकीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांचे वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शनिवार २१ मार्च रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता रूपेश निकाळजे (बीड) प्रस्तुत क्रांतीचा साक्षीदार हे एक पात्री नाटक सादर होणार असून तदनंतर महामानवांना सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा खोत व इतर सन्माननीय लोकप्रतिनिधी महोदय व विविध प्रशासकीय अधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंबातील वंशज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे कुटुंबातील वंशज व आप्पासाहेब पाटील यांचे कुटुंबातील वंशज देखील उपस्थित राहणार आहेत.
रविवारी २२ मार्च रोजी सायंकाळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक उत्कर्ष शिंदे व कबीर नाईकनवरे प्रस्तुत प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या दोन दिवसीय उपक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या वतीने सवलतीच्या दरात पुस्तकांचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाने सामाजिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली गेलेल्या आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सन्मान भूमीत महामानवांच्या कार्यांना आणि विचारांना अभिवादन करण्यासाठी तमाम पत्रकार बंधू, संस्था संघटना पदाधिकारी, नागरिकांनी व अनुयायांनी या कार्यक्रमांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन सचिन साळे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर यांनी केले आहे.