no images were found
‘इत्ती सी खुशी’ मालिकेत काम करणारा रजत वर्मा म्हणतो, “या मालिकेने एक मोठी शिकवण ही दिली आहे की खरा आनंद मोठ्या विजयात नाही, तर छोट्या छोट्या क्षणांत असतो”
मुंबई, : सोनी सबवरील ‘इत्ती सी खुशी’ मालिकेतील अन्विता (सुंबुल तौकीर खान)च्या कहाणीने प्रेक्षकांच्या अंतःकरणाला हात घातला आहे. अस्तित्वाचा संघर्ष पार करून अन्विता आता आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी धडपड करत आहे. तिच्या जीवनातील प्रत्येक चढ-उतारात तिच्या सोबतीला विराट असतो, जी भूमिका रजत वर्माने केली आहे. विराट एक प्रेमळ, प्रामाणिक तरुण आहे. प्रेम ही त्याच्या जीवनातील महत्त्वाची प्रेरणा आहे पण दुर्दैवाने या भावनेमुळेच त्याला भावनिक संघर्ष सोसावा लागत आहे.
निःस्वार्थ भावनेने प्रेम करण्याची क्षमता विराटमध्ये आहे. हे प्रेम अन्विताच्या कुटुंबावरचे असो किंवा त्याच्या आसपासच्या लोकांवर असो. त्याच वेळी, त्याचे निष्काळजीपणे घेतलेले निर्णय आणि खोटे बोलण्याकडे असलेला कल हे त्याच्यातील मोठे दुर्गुण आहेत, ज्यांच्यामुळे तो भलत्याच परिस्थितीत ढकलला जातो. निरागसता, उत्स्फूर्तता आणि भावनिक प्रामाणिकपणा या गुणांमुळे विराट अत्यंत मानवी आणि आजच्या काळात संबद्ध वाटणारी व्यक्तिरेखा आहे.
आपल्या व्यक्तिरेखेविषयी बोलताना रजत वर्मा सांगतो की विराटमध्ये त्याला स्वतःचे कसे ठळक प्रतिबिंब दिसते.
‘इत्ती सी खुशी’मालिकेत तू साकारत असलेल्या विराटच्या व्यक्तिरेखेची सर्वात मोठी ताकद आणि मोठे दोष कोणते?
विराटची सगळ्यात मोठी ताकद ही आहे की, तो सगळ्यांना खूप प्रेम देतो, मग ती अन्विता असो, तिचा परिवार असो किंवा मुले असोत. त्याला वाटते की प्रेमाने तो काहीही साध्य करू शकतो. प्रेमाचा संबंध असेल तर तो कसलीही निर्मिती करू शकतो, कोणतीही गोष्ट दुरुस्त करू शकतो आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतो. खोटे बोलणे आणि त्याचे निष्काळजी वागणे हे त्याचे मोठे दोष आहेत. त्याच्या खोटे बोलण्याच्या सवयीमुळे त्याच्या जीवनात सगळे नाट्य घडले आहे. त्यामुळे हा नक्कीच त्याचा सगळ्यात मोठा दोष आहे.
विराटचे व्यक्तिमत्व तुला स्वतःमध्ये दिसते का?
त्याच्या गमत्या आणि मोहक स्वभाव माझ्यात आहे. त्याचा फटकळपणा माझ्यात नाही. या व्यतिरिक्त, तो फारच बेफिकीर आहे आणि कोणत्याही गोष्टीचे निराकरण प्रेमाने करता येते असे त्याला वाटते. खरं तर तो थोडा मूर्ख आहे, त्यामुळे मी बराचसा त्याच्यासारखा आहे. म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वातील 80% भाग माझ्यासारखा आहे.
आत्तापर्यंत कोणते दृश्यतुझ्यासाठी भावनिक दृष्ट्या आव्हानात्मक होते? तू त्यासाठी तयारी कशी केलीस?
माझ्यासाठी सर्वात जास्त भावनिक दृष्ट्या आव्हानात्मक भाग तो होता जेव्हा विराट अन्वितापासून दूर होतो आणि संजयमुळे आपल्या साखरापुड्याच्या वेळी पळून जातो. तो संपूर्ण आठवडा फारच भावुक होता. माझे प्रेम व्यक्त करणे, मी का पळून गेलो हे समजावून देणे आणि त्यानंतरचा सगळा भाग. शूटिंग शेड्यूलची मला खूप मदत झाली, कारण या मालिकेत परत येण्याअगोदर माझ्याकडे एक आठवड्याची विश्रांती होती. त्यानंतर विराट तिचे अपहरण करायला येतो. या विश्रांतीत, मला सेटची, माझ्या सह-कलाकारांची आणि सगळ्याचीच खूप आठवण आली. याचा मोठा भावनिक फायदा झाला. मी सोशल मीडियापासूनही लांब राहिलो आणि जाणीवपूर्वक लोकांशी संभाषण करण्याचे टाळले, जेणेकरून त्या भावनिक अवस्थेत मी राहू शकेन. शेवटी ते दृश्य आम्ही जेव्हा चित्रित केले, तेव्हा ते खूप सुंदर उतरले. मला वाटते, त्या शेड्यूलने मला खूप मदत केली.
विराटच्याअन्विताशी असलेल्या नात्याचे वर्णन तू कसे करशील?
विराट आणि अन्विताचे नाते खूप भावनिक आणि उत्कट आहे. ते प्रेम, ओढ आणि त्यागावर उभे आहे. परिस्थितीमुळे ते दोघे दुरावले असले, तरी त्यांच्यातील बंध दृढ आहेत. विराटचे वागणे नेहमी तिच्यावरील प्रेमाने प्रेरित असते.
तू आत्तापर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा विराटची व्यक्तिरेखा कशी वेगळीआहे?
विराट निःस्वार्थ भावनेने प्रेम करतो. लोक आणि समाज यांचा तो आपलेपणाने विचार करतो. एकदा एकावर विश्वास ठेवला की तो नेहमी त्याच्या पाठीशी उभा राहतो. त्याच्यात अहंकार नाही, आणि ज्याच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीसाठी तो काहीही करू शकतो. मी या आधी इतके निःस्वार्थी पात्र कधीच निभावलेले नाही. त्यामुळे विराट माझ्या आधीच्या भूमिकांपेक्षा खूप वेगळा आहे.
शूटिंग दरम्यान मूड हलका–फुलका करण्याचे काम कोण करत असते?
सेटवर प्रत्येकाची वेगळी ऊर्जा आहे. नेहमी कोणी ना कोणी विनोद करत असतो आणि वातावरण हलके-फुलके ठेवत असतो. सेटवरचे हे खेळकर वातावरण तीव्र दृश्ये चित्रित करताना खूप मदतरूप ठरते.
‘इत्ती सी खुशी’मालिकेने तुला कोणती शिकवण दिली?
या मालिकेने मला दिलेली एक शिकवण म्हणजे आनंद नेहमीच मोठ्या विजयामधून येत नाही, तर तो छोट्या छोट्या क्षणांमध्ये शांतपणे वास करतो, हे क्षण आपल्याला आयुष्यभर आठवतात. त्या-त्या क्षणात जगणे आणि छोट्या आनंदांवर फोकस करण्यामुळेच खरा आनंद मिळतो. दुसरी शिकवण मला ही मिळाली की, प्रेमात खरोखर अशी ताकद असते, जी सगळ्या जखमा भरून काढते.
विराट बऱ्याचदा मनातल्या उर्मीने वागतो.त्याला लोकांचा प्रिय ठेवूनच हे दाखवणे तुला कसे जमले?
हे जरा आव्हानात्मक होते, कारण विराट लोकांचा आवडता राहणे गरजेचे होते. आज ते मालिकेतील एक अत्यंत लोकप्रिय पात्र आहे. त्याच्या उर्मीने वागण्याला मी भाबडेपणाची जोड दिली. तो कोणत्याही दुष्ट भावनेने नाही, तर निष्पाप भावनेने प्रतिसाद देतो. लेखकांनी त्याचे संवाद उत्कृष्ट लिहिले आहेत आणि व्यक्तिमत्वाचा विकासही छान दाखवला आहे. त्यामुळे हे साध्य होते की, त्याचे अचानक उर्मीने वागणे खरे वाटते आणि नकारात्मक वाटत नाही.