no images were found
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मध्ये राशी आणि ऋषभच्या लग्नाला पुष्पा सहमत होईल का?
मुंबई, : सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ या मालिकेने नुकताच ७ वर्षांचा लीप घेत नवीन पर्वाची सुरुवात केली आहे. प्रेक्षक आता पुष्पा (करुणा पांडे) हिला वकिलाच्या नव्या व्यावसायिक प्रवासात पाहत आहेत. स्वतःचा मार्ग निर्माण करण्यासाठी ती निर्धारपूर्वक प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे तिच्या कुटुंबातील नाती अनपेक्षित वळण घेत आहेत. जीवनातील प्रत्येक अडथळ्यावर मात करण्याचा तिचा अढळ निर्धार हा एक आशेचा आणि योग्य गोष्टींसाठी उभे राहण्याच्या सामर्थ्याचा प्रेरणादायी प्रवास आहे.
पुढील भागांमध्ये छोटू चहावाल्याच्या (रामदेव मिश्रा) आजारपणाविषयीच्या तपासादरम्यान पुष्पाला एक धक्कादायक सत्य समजते की, त्या वस्तीतल्या अनेक लोकांना तेथील बेकायदेशीर कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे त्रास झाला आहे. या गोंधळात पुष्पाला आपली मुलगी राशी (अक्षया हिंदळकर) आणि ऋषभ (श्रेय मराडिया) यांच्या नात्याविषयी समजते.
त्यामुळे तिच्या घरात व आयुष्यात एक भावनिक वादळ येते. राशीला वाटते की, तिच्या आईने आयुष्यात तिला कधीच भावनिक साथ दिली नाही. आपले वागणे आईच्या विरोधात असले तरी ऋषभशीच लग्न करायचे, असे राशी ठरवते.
पुष्पा आणि ऋषभच्या पालकांमधील ताणलेले संबंध या परिस्थितीला आणखी गुंतागुंतीचे बनवतात. आता प्रश्न असा आहे की, पुष्पा राशी आणि ऋषभच्या लग्नाला संमती देईल का?
राशीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया हिंदळकर म्हणते, “या सात वर्षांत राशी मोठी झाली आहे आणि त्यासोबत तिला सत्य बोलण्याचं धैर्य आलं आहे. ती तिच्या आईवर मनापासून प्रेम करते, पण त्यांच्या नात्यात आलेल्या दुराव्यामुळे तीही दुखावली आहे. पुष्पासोबतचा संघर्ष फक्त ऋषभबद्दलचा नाही, तर वर्षानुवर्षे साचलेल्या व न ऐकल्या गेलेल्या भावनांबद्दलचा आहे. राशी अशा वळणावर उभी आहे, जिथे तिला ठरवावं लागणार आहे की, आपल्या प्रेमासाठी लढायचं का कुटुंबाच्या अपेक्षांना मान द्यायचा.हे भावनिकदृष्ट्या तीव्र दृश्य साकारताना मला खूप आव्हानात्मक, पण समाधानकारक अनुभव आला. मला आशा आहे की, प्रेक्षक राशीच्या प्रवासाशी जोडले जातील आणि कुटुंबातील मोकळ्या संवादाचं महत्त्व ओळखतील.”