no images were found
कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय कौशल्य आत्मसात करणे आवश्यक : डॉ. विलास शिंदे
कोल्हापूर(प्रतिनिधी ): गतिशील प्रशासनासाठी कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील दूर शिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र आणि आस्थापना विभागा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यशाळेत ते अध्यक्ष म्हणुन बोलत होते. यावेळी उपकुलसचिव श्री. विनय शिंदे, सहा कुलसचिव दिलीप मोहाडीकर व सर्व विभागातील रोजंदारी कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. विलास शिंदे म्हणाले की, माणसाने आयुष्यभर विद्यार्थी असले पाहिजे. आजच्या युगात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी विविध कौशल्य अवगत केली पाहिजेत. कोणतेही काम एक निष्ट्येने केल्यास निश्चित फळ मिळणार आहे. त्यासाठी कर्तव्याला महत्व दिले पाहिजे. सहा. कुलसचिव श्री. सुरेश बंडगर कार्यालयीन शिस्त याविषयावर बोलताना म्हणाले की,कार्यालयात वेळेवर येणे, वेळेचे नियोजन करणे, रजेबाबत शिस्त पाळणे गरजेचे आहे. वेषभूषा, केशभूषा महत्वाची आहे. परिपत्रके यांची अंमलबजावणी केली पाहिजे.
यशवंतराव चव्हाण स्कुल आणि रूरल डेव्हलोपमेंट विभागाच्या सहा.प्राध्यापक डॉ. कविता वडराळे प्रशासकीय व्यवस्थापन कौशल्य याविषयावर म्हणाल्या की,प्रशासकीय व्यवस्थापन कौशल्य म्हणजे व्यवसाय व्यवस्थापनातील कार्यें पार पाडण्यासाठी आवश्यक असलेली क्षमता होय. यामध्ये वेळेचे नियोजन करणे, कागदपत्रे हाताळणे, बैठकीचे समन्वय साधणे, तसेच आंतरिक व बाह्य भागधारकांशी संवाद साधणे. यांचा समावेश होतो. त्यामुळे कामकाज सुरळीत व कार्यक्षमतेने पार पडते.
संचालक डॉ. कृष्णा पाटील म्हणाले की,प्रशासकीय साक्षरतेसाठी जीवन कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. आपला दृष्टीकोन, कौशल्य आणि ज्ञान हे त्यासाठी म्हणत्वाचे आहे.माहिती तंत्रज्ञान अवगत करणे गरजचे आहे. त्याच बरोबर संभाषण कौशल्य महत्वाचे आहे.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रविण लोंढे यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ. सुप्रिया मोगले, क्रांती भोसले यांनी करुन दिली. सूत्रसंचालन डॉ.प्रियांका कांबळे यांनी केले. कल्याणी भास्कर यांनी आभार मानले.