
no images were found
राहुल गांधींनी भारत जोडो नव्हे तर काँग्रेस पक्ष जोडो यात्रा काढावी : शायनी एनसी
कोल्हापूर : संपूर्ण देशभरातून भारतीय जनता पक्षाला मोठा जनाधार आहे. वेगवेगळ्या निवडणुकीत मतदानातून हे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाची अवस्था बिकट झाले आहे.तेंव्हा राहुल गांधी भारत जोडो यात्रा करण्यापेक्षा क पक्ष वाचविण्यासाठी काँग्रेस जोडो यात्रा काढावी असा टोला भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या शायनी एनसी यांनी लगावला. शायनी एनसी या शनिवारी 29 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. जायंटस ग्रुप ऑफ कोल्हापूरतर्फे आयोजित कार्यक्रमादरम्यान त्या प्रसारमाध्यमाशी बोलत होत्या.
यावेळी त्यांनी नोटावर देवदेवतांचे फोटो छापण्यावरून अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडले. आमच्या हृदयात देव वसलेला आहे. आम्ही २४ तास त्या देवदेवतांचे स्मरण करत असतो. मात्र केजरीवाल हे निवडणूक आणि मतपेटीवर डोळा ठेवून नोटावर देवदेवतांचे फोटो छापण्याची मागणी करत आहेत अशी टीका त्यांनी केली.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान भाजपकडून देशामध्ये नफरत पसरवण्यात असल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना शायनी एनसी यांनी, राहुल गांधी यांची भाजपवरील टीका निरर्थक आहे. भाजपचा अजेंडा हा सबका साथ सबका विकास असा आहे. संपूर्ण देशवासियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांनी भाजपवर टीका करण्यापेक्षा स्वतःची कर्तबदारी सिद्ध करावी. स्वतःचा पक्ष वाचवावा. असेही शायनी एनसी यांनी सूचना केली.
राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष भारत यात्रेमध्ये सामील होणार आहेत याकडे लक्ष वेधले असता एनसी यांनी आता त्या दोन्ही पक्षांमध्ये काय शिल्लक आहे. अशा शब्दात खिल्ली उडवली. मुंबईला कमजोर करण्याचा प्रश्नच नाही भाजपचा मेक इन इंडिया हा नारा आहे शिवाय येत्या महापालिका निवडणुकीत मुंबईत कोणाची ताकत आहे हे शिवसेना ठाकरे गटालाही कळून चुकेल अशा शब्दात शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले.
महाराष्ट्रातील उद्योग व्यवसाय गुजरातला पळवले जात असल्याचे आरोपावर शायनी एनसी म्हणाल्या, उद्योगधंद्यांच्या गुंतवणुकीविषयी राजकीय नेता ठरवू शकत नाही. कोणत्या ठिकाणी, कोणत्या राज्यांमध्ये गुंतवणूक करायची हे उद्योजक ठरवत असतात. त्यामुळे महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला नेले या आरोपात काही तथ्य नाही.
पत्रकार परिषदेला भाजपचे महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, जायंटसचे गिरीश चितळे आदी उपस्थित होते.