no images were found
इत्ती सी खुशी’ मालिकेत अभिनेता रजत वर्मा साकारणार विराटचे पात्र, जे अन्विताच्या जीवनातील एक मोहक रहस्य
सोनी सबवर लवकरच ‘इत्ती सी खुशी’ ही कौटुंबिक मालिका सुरू होणार आहे. त्यातील हृदयस्पर्शी कथानक आणि दमदार कलाकार यामुळे प्रेक्षकांची या मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली आहे. अभिनेता रजत वर्मा विराट या व्यक्तिरेखेच्या रूपात मालिकेत दाखल झाला आहे. अन्विता (सुम्बुल तौकीर खान)च्या गजबजलेल्या जीवनात विराटचे एक शांत पण गुंतागुंतीचे अस्तित्व आहे.
विराट हा टेलिव्हिजनवरील सर्वसामान्य नायकासारखा नाही. तो थोडा रहस्यमय आणि अंतर्मुख आहे. वरकरणी तो बोल्ड, मदतीला धावून जाणारा आणि इतरांसाठी आवर्जून काही करणारा वाटतो. पण अन्वितासाठी विराट एक कोडे आहे. त्याच्यातील आपुलकी नेहमी दिसते, पण त्याच्या मोहकतेखाली एक जटिल भूतकाळ आहे, जो लपवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. यामुळे त्याच्या आणि अन्विताच्या नात्यात अडथळा येतो. तो तिच्या जीवनातील काहीसा अनाकलनीय असा माणूस आहे.
आपल्या व्यक्तिरेखेविषयी बोलताना रजत वर्मा म्हणतो, “‘इत्ती सी खुशी’ एक खास कहाणी आहे. ही कहाणी आहे, छोट्या छोट्या आनंदांची, मूक त्यागाची आणि जीवनाला वेगळा आकार देणाऱ्या अनपेक्षित नात्यांची आहे. विराट आणि अन्विता यांच्यातील नात्याला खास टीव्ही शैलीचा रोमान्स म्हणता येणार नाही. ते संथ आहे, त्याला अनेक कंगोरे आहेत आणि उघड उघड नाही, तर शांततेच्या क्षणांवर ते उभे राहिले आहे. अन्विताचे आयुष्य तर आपल्या भावंडांना सांभाळण्यात, त्यांची जबाबदारी पार पाडण्यात व्यतीत होत आहे. अशा एकसुरी जीवनात विराटचे आपल्या मनात काही स्थान आहे, याची तिला जाणीवही नाही. हा स्थिरपणा आणि आपुलकी पडद्यावर जिवंत करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य मानतो.”