no images were found
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होवू इच्छिणाऱ्यांनी 31 जुलै पर्यंत सहभागी होण्याचे आवाहन
कोल्हापूर, : प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2025-26 अंतर्गत खरीप व रब्बी हंगामाकरिता पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पिक उत्पादनावर विपरीत परिणाम करणा-या इतर बाबीमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोग आधारे / तांत्रिक उत्पादन आधारे या महसूल मंडळामध्ये पिकांच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत होणारी घट गृहित धरुन नुकसान भरपाई देय राहणार आहे. यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी, पत्ता-मुंबई क्षेत्रिय कार्यालय, लोकचेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई या कंपनीची निवड करण्यात आली आहे. इच्छुकांनी 31 जुलै 2025 पर्यंत या विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.
प्रधनमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून राज्यात राबविण्यात येत होती. खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2024-25 अखेर 1 रु. प्रति अर्ज भरुन सर्वसमवेशक पिक विमा योजना राबविण्यात आली होती. या कालावधीत राबविलेल्या योजनेचा आढावा घेतल्यानंतर त्यामध्ये सुधारणा करुन राज्य शासनाने 24 जून 2025 च्या शासन निर्णयान्वये सन 2025-26 वर्षाकरिता उत्पादनावर आधारीत सुधारीत पिक विमा योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. खरीप हंगाम सन 2025 पासून सुधारीत पिक विमा योजना राबविण्यासाठी मार्गदर्शक सुचना प्राप्त झालेल्या आहेत. ही पीक विमा योजना बीड पॅटर्न (८०:११०) (Cup and Cap Model) आधारित 1 वर्षाकरिता अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकासाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविली जाणार आहे.
योजनेची वैशिष्ट्ये-
ही योजना अधिसुचित पिकासाठी केवळ अधिसुचित क्षेत्रासाठीच लागू असणार आहे. सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांसाठी ऐच्छिक आहे. कुळाने अगर भाडेपट्याने शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत. भाडेपट्टीने शेती करणा-या शेतक-यांना पीक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे. शेतक-यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2 टक्के व रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के आहे. सर्व अधिसुचित पिकासाठी जोखीमस्तर 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. अधिसुचित पिकाचे मागिल 7 वर्षापैकी सर्वाधिक उत्पन्नाच्या 5 वर्षाच्या सरासरी उत्पादन (x) गुणिले त्या पिकाचा जोखीमस्तर विचारात घेवून निश्चित केले जाईल. योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार नुकसान भरपाईचे दायित्व विमा कंपनीवर राहणार आहे. मृत शेतक-यांच्या नावे तसेच इतर अवैध मार्गांनी विमा काढला गेल्यास तो अर्ज रद्द केला जाईल.सहभागासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक (AGRISTACK farmer ID) अनिवार्य आहे. ई-पिक पहाणी अंतर्गत पिकाची नोंद करणे बंधनकारक राहील.
जोखमीच्या बाबी- योजने अंतर्गत खरीप व रब्बी हंगामाकरिता पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पिक उत्पादनावर विपरीत परिणाम करणा-या इतर बाबीमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोग आधारे / तांत्रिक उत्पादन आधारे या महसूल मंडळामध्ये पिकांच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत होणारी घट गृहित धरुन नुकसान भरपाई देय राहील.
उंबरठा उत्पादन :- अधिसूचित क्षेत्रातील, अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील 7 वर्षातील सर्वाधिक उत्पादनाची 5 वर्षांचे सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकाचा जोखीमस्तर विचारात घेऊन निश्चित केले जाते.
योजनेतील पिके : खऱीप हंगाम – भात (जि), खरीप ज्वारी, नाचणी (रागी), सोयाबीन, भुईमूग, रब्बी हंगाम- गहू (बा), रब्बी ज्वारी (जि), हरभरा व उन्हाळी भुईमुग.
विमा कंपनी – भारतीय कृषी विमा कंपनी, पत्ता-मुंबई क्षेत्रिय कार्यालय, लोकचेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई. 400 059
विमा नुकसान भरपाई निश्चिती
खरीप 2025 च्या हंगामात उत्पादन आधारित नुकसान भरपाई निश्चित करताना महसूल मंडल, तालुक्यात पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेले सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यास खालील सूत्रानुसार नुकसान भरपाईची रक्कम काढली जाते. सरासरी उत्पादन काढताना कापूस, सोयाबीन, भात या निवडक पिकांच्या बाबतीत रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानद्वारे प्राप्त उत्पादनास 30 टक्के आणि पीक कापणीद्वारे प्राप्त उत्पादनास 70 टक्के भारांकन देऊन पिकाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे. उर्वरित पिकांचे बाबतीत पीक कापणीद्वारे प्राप्त उत्पादन गृहीत धरले जाणार आहे.