no images were found
कसबा बावडा भाजी मंडईतील असुविधांविरोधात आप चा ठिय्या
कसबा बावडा (प्रतिनिधी): येथील भाजी मंडई मध्ये अनेक शेतकरी, भाजी विक्रेते तसेच परिसरातील अनेक नागरिक भाजी खरेदी करण्यासाठी येथे येत असतात. परंतु गेले अनेक दिवस मंडई मध्ये पावसाचे पाणी घुसत आहे. तसेच येथील विद्युत लॅम्प नादुरुस्त असल्याने मंडईला अंधाराने व्यापले आहे. यामुळे येथील विक्रेते व नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
या समस्येकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी आप च्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व शहर सचिव समीर लतीफ यांनी केले.
पाणी निर्गमित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, परिसरात उजेड व्हावा यासाठी विद्युत लॅम्प बसवण्यात यावेत अशी आंदोलकांनी केली. ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता अवधूत नेर्लेकर, विद्युत विभागाचे सदानंद धनवडे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन मंडईतील कामांसाठी 2,94,000 चे अंदाजपत्रक तयार केले असून पुढील मान्यतेसाठी पाठवले असल्याचे सांगितले. तसेच कामाचे कार्यादेश प्राप्त होताच काम सुरु करण्याचे पत्र आप पदाधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, विजय हेगडे, अनिल जाधव, राकेश गायकवाड, संजय नलवडे, रमेश कोळी, मयुर भोसले, स्वप्नील काळे आदी उपस्थित होते.