Home मनोरंजन ‘बादल पे पांव है’ च्या हृदयस्पर्शी प्रवासाचा समारोप

‘बादल पे पांव है’ च्या हृदयस्पर्शी प्रवासाचा समारोप

10 second read
0
0
29

no images were found

‘बादल पे पांव है’ च्या हृदयस्पर्शी प्रवासाचा समारोप

वेधक कथानक मांडणी आणि हृदयस्पर्शी नाट्य सादर करणारी सोनी सबवरील ‘बादल पे पांव है’ ही मालिका 14 डिसेंबर 2024 रोजी समाप्त होत आहे. प्रेम, कुटुंब यांना प्राथमिकता देऊन त्यांच्यासाठी कितीही कष्ट करण्यास तत्पर असलेल्या बानी (अमनदीप सिद्धू) ची गोष्ट या मालिकेत सांगितली आहे. आकर्षक कथानक आणि चरचौघांसारख्या व्यक्तिरेखा यामुळे ही मालिका प्रेक्षकांना भावली आहे.

रजत (आकाश आहुजा) आणि बानी यांच्यातील नात्याने प्रेम, गैरसमज आणि त्यातून सुटका असा प्रवास करताना हे दाखवून दिले की, दृढ असलेली नाती संकटांमध्येही कशी टिकून राहतात. स्टॉक मार्केटसारख्या पुरूषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात काम करताना बानीला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. सुरुवातीला आपल्या सासरच्या लोकांचा विरोध आणि लावण्याने (भाविका चौधरी) उभ्या केलेल्या अडचणींचाही सामना करावा लागला. आता मालिकेच्या शेवटच्या टप्प्यात प्रेक्षक हे बघण्यास उत्सुक आहेत की बानी आणि रजत पुन्हा एकत्र येणार का.

मालिकेतील कलाकार आता आपल्या व्यक्तिरेखांचा आणि या प्रवासात त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. आपले अनुभव, काही लक्षात राहिलेले क्षण आणि ‘बादल पे पांव है’ मालिकेचे त्यांच्यासाठी असलेले महत्त्व सांगत आहेत या मालिकेतले कलाकार.

बानीची भूमिका करणारी अमनदीप सिद्धू म्हणते, “या मालिकेचा शेवट होताना एक सुंदर प्रवास संपत असल्याची  हुरहूर वाटते आहे. माझ्या मनात बानीचे विशेष स्थान आहे. अनेक प्रकारे ती माझ्यासारखीच आहे. आम्हाला अमाप प्रेम आणि समर्थन देणाऱ्या प्रेक्षकांची मी ऋणी आहे. ते माझ्यासाठी सर्वस्व आहेत. माझ्या कल्पनेपलीकडे जाऊन त्यांनी आम्हाला स्वीकारले. या मालिकेच्या माध्यमातून मला खूप छान मित्र मिळाले आहेत आणि एका उत्तम प्रॉडक्शन हाऊससोबत आणि वाहिनीसोबत काम करण्याची संधी मिळाली.”

रजत खन्नाची भूमिका करणारा आकाश आहुजा म्हणतो, “मला खूप गुणी आणि प्रेमळ लोकांबरोबर काम करण्याचे भाग्य लाभले. आयुष्यभर टिकतील असे मित्र मला इथे मिळाले आहेत. प्रेक्षकांनी दिलेले प्रेम आणि आधार पाहून तर मी भारावून गेलो आहे. प्रेक्षक मालिकेत किती गुंतून जातात हे पाहताना मला आश्चर्य वाटते. रेटिंगद्वारे किंवा व्यक्तिगत प्रतिक्रियेच्या रूपात प्रेक्षकांकडून मला जे कौतुक मिळाले, ते माझ्यासाठी सर्वात मोठ्या पुरस्कारासारखे आहे. रजत एक अशी व्यक्तिरेखा आहे, जी मला खूप जवळची वाटते. ती साकारताना मला खूप आनंद मिळाला. हा एक फारच मोहक प्रवास होता आणि या प्रवासातील अनुभव आणि आठवणी सदैव माझ्यासोबत राहतील.”

बिशन खन्नाची भूमिका करणारा सूरज थापर म्हणतो, “शेवटचे दृश्य चित्रित करताना मन फारच भावुक झाले होते. शिल्पा आणि बानीचा निरोप घेण्याचा क्षण चित्रित करताना तर माझे डोळे भरून आले होते. या व्यक्तिरेखांमध्ये परस्पर इतके प्रेम आहे, आणि ते पडद्याच्या मागे देखील तसेच दिसते. आमचे सगळ्यांचे एकमेकांशी अगदी घट्ट नाते जुळले आहे. आणि ही नाती मला आयुष्यभर सोबत करतील. या सेटवरचा प्रत्येक क्षण आनंदाने आणि मैत्रीने भरला होता. हा प्रवास अविस्मरणीय होता. हा अनुभव मला दिल्याबद्दल मी देवाचा ऋणी आहे.”

गौरव खन्नाची भूमिका करणारा लोकेश बट्टा म्हणतो, “‘बादल पे पांव है’ ला निरोप देताना माझे मन कृतज्ञतेने आणि अनेक सुंदर क्षणांच्या आठवणींनी भरून गेले आहे. ही मालिका हे माझ्यासाठी फक्त काम नव्हते, तर तो आनंद आणि अविस्मरणीय क्षणांचा प्रवास होता. माझे सह-कलाकार जणू माझे कुटुंब बनले आहेत. आम्ही एकत्र व्यतीत केलेला समय माझ्या मनात नेहमी जिवंत राहील, मग आम्हीएकत्र केलेली गंभीर दृश्ये असो किंवा दोन दृश्यांच्या मधल्या वेळेत अनुभवलेले मस्तीचे क्षण! माझ्यावर विश्वास दाखवून मला ही संधी दिल्याबद्दल मी या वाहिनीचा आणि सरगुन मेहता व रवी दुबे या निर्मात्यांचा खूप खूप आभारी आहे.”

शिल्पा खन्नाची भूमिका करणारी मानसी शर्मा म्हणते, “निरोप देणे हे नेहमीच जड जाते. यावेळी तर ते आणखीनच कठीण होते. आम्हाला कल्पनाही नव्हती की आमच्यात इतके घनिष्ठ संबंध निर्माण होतील. पण शूटिंगच्या शेवटच्या दिवशी सगळ्यांनाच दाटून येत होते. आमच्या सगळ्यांसाठीच तो एक भावनिक क्षण होता, कारण मालिका संपत आली होती. या सेटवर आमचे परस्परांत जे प्रेम निर्माण झाले, जी नाती तयार झाली ती खरोखर खास आहेत. लहान मुले असोत किंवा मोठे आमची सगळ्यांचीच गट्टी जमली होती. खरं म्हणजे आम्ही सगळे खूप वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून, ठिकाणांहून आलो होतो. मला खात्री आहे की, हा प्रवास आणि या एकत्र मिळून निर्माण केलेल्या आठवणी आमचा पाठपुरावा करणार आहेत. हा एक खूप सुंदर अनुभव होता. त्या सगळ्याच गोष्टींसाठी मी कृतज्ञ आहे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…