
no images were found
मतदारांसाठी मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध – डॉ. अश्विनी जोशी
मुंबई : मतदारांना मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी (मुंबई शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.
या पत्रकार परिषदेस मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अति. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी निवडणूक फरोग मुकादम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे तसेच मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
डॉ. जोशी म्हणाल्या, प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहे, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्प आदि सुविधा पुरविण्यात येणार असून प्रत्येक मतदान केंद्राचे सूक्ष्म नियोजन करुन अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात विविध पथके तैनात करण्यात आली असून यासाठी क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
निवडणूक प्रक्रिया निःपक्षपाती, शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज – संजय यादव
सर्व निवडणूक प्रक्रिया निःपक्षपाती, भयमुक्त आणि शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज असून सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अति. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे. मतदान केंद्रावर मतदाराना अडचणी येणार नाहीत याची दक्षता घेवून प्रत्येक मतदान केंद्रावर प्रतीक्षा कक्ष, टोकन सिस्टीम याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे श्री. यादव यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, मतदारांना मतदान केंद्राची माहिती व्हावी यासाठी बीएलओमार्फत घरोघरी मतदार चिट्टीचे वाटप करण्याची मोहीम सुरू आहे. मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून शालेय विद्यार्थ्यांकडून पालकांना मतदानासाठी संकल्पपत्र हा अभिनव उपक्रम मुंबई शहर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबईशहर जिल्हयात 10 विधानसभा मतदार संघांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी आचारसंहितेच्या काटेकोर व प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात येत आहे.