
no images were found
बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत !
कोल्हापूर – बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे. या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे. सरकारविरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले आहे. जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष करून त्यांच्या उघडपणे हत्या करणे, हिंदूंच्या घरांवर आक्रमणे करणे, हिंदूंची दुकाने लुटणे, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे-आग लावणे, हिंदु महिलांवर बलात्कार करणे, हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहे. या गोष्टींमुळे तेथील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात बांगलादेशी सैन्यदलाने जरी हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले असेल, तरी भारत सरकारने त्यावर विसंबून न रहाता हिंदू समाजाच्या आणि मंदिरांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, श्री. अर्जुन आंबी, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, ‘महाराज प्रतिष्ठान’चे संस्थापक-अध्यक्ष श्री. निरंजन शिंदे, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासणे आणि श्री. विकास जाधव, हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे, हिंदू एकता आंदोलनाचे शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शिवानंद स्वामी, प्रीतम पवार, बाबासाहेब भोपळे, दीपक कातवरे उपस्थित होते.
बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समिती पुढील मागण्या केल्या आहेत. प्रथम बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले, घरांची लूट, मंदिरांवरील हल्ले, मूर्तींची तोडफोड, महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी तेथील सैन्य दलाला कठोर सूचना द्याव्यात. बांगलादेशातील हिंदूंवरील वाढते हल्ले लक्षात घेता तेथील हिंदूंना सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि त्यांना तातडीने सुरक्षा पुरवावी. आतापर्यंत तेथील हिंदूंच्या जीवित वा मालमत्ता यांची जी हानी झाली असेल, त्याची तातडीने भरपाई करावी. भारत सरकारने हा विषय तातडीने ‘संयुक्त राष्ट्र संघा’त मांडून बांगलादेशामध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या शिष्टमंडळाला भेट देण्याची मागणी करावी. बांगलादेशातील हिंसाचारामुळे तेथील जे हिंदु विस्थापित होऊन भारतात आश्रय मागत असतील, त्यांना ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’द्वारे (सीएए) भारत सरकारने आश्रय द्यावा. तसेच यापूर्वीही जवळपास ५ कोटी बांगलादेशी घुसखोर भारतात शिरले आहेत, या घटनेनंतर पुन्हा ही घुसखोरी वाढण्याची शक्यता पहाता भारतीय सीमेवर चोख बंदोबस्त करावा.
‘सोशल मिडीया’च्या माध्यमातून बांगलादेशातील अत्याचाराचे जे भयंकर व्हिडिओ समोर येत आहेत, त्यावरून भारत सरकारने वेळीच लक्ष घातले नाही, तर बांगलादेश हा दुसरा पाकिस्तान होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी हिंदूंचा मोठ्या प्रमाणात नरसंहार होण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर धर्मांध जिहादी आतंकवाद्यांचे मनोबल वाढून ते भारतातही त्याच्या छुप्या पाठिराख्यांच्या मदतीने हिंसाचार माजवण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय पोलीस यंत्रणा, प्रशासन यांच्यासह समस्त भारतियांनी सतर्क रहायला हवे. तसेच स्वसंरक्षणासाठी सिद्ध रहाण्याचीही आवश्यकता असल्याचे समितीने म्हटले आहे.