
no images were found
‘वागले की दुनिया’ मध्ये नवीन क्षितिजांचा शोध
सोनी सबवरील ‘वागले की दुनिया’ ही मालिका सामान्य माणसाच्या दैनंदिन संघर्षाचे चित्रण करून, जीवनातील कोणत्याही परिस्थितीत वागले कुटुंब कसे एकत्र राहते हे दाखवून हृदयाला हात घालते. अलीकडील भागांमध्ये, वागले कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीतील अथर्व(शीहान कपाही) आणि सखी(चिन्मयी साळवी) त्यांच्या आयुष्यातील नव्या अध्यायाला सुरुवात करतात. अथर्व त्याला हव्या असलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवतो तर सखी एका मीडिया स्कूलमध्ये प्रवेश करते.
आगामी एपिसोडमध्ये, अथर्वचे कॉलेज-जीवन त्याच्या वैयक्तिक आव्हानांनी सुरू होते. त्याला त्याच्या वर्गातील काही नतद्रष्ट मुलांच्या गुंडगिरीचा सामना करावा लागतो, ज्याचा त्याच्यावर खोलवर परिणाम होतो. गोड आणि सुरक्षित वातावरणात वाढलेले वागलेंचे हे शेंडेफळ आत्मशोध घेते आणि गैरवर्तनाच्या विरोधात उभे राहायला शिकते. इकडे, सखीला तिच्या रोल मॉडेलबद्दल लिहायची कॉलेज असाइनमेंट मिळते. सखी, करारी आणि आधुनिक तसेच करियरला प्राधान्य देणारी राजेशची बॉस कियाराची(अंजू जाधव) निवड करते, याचे वंदनाला(परिवा प्रणती) आश्चर्य वाटते आणि ती खट्टू होते. दोन्ही मुले नवीन आव्हाने पेलत असताना आणि त्यांना परिस्थितीची जाणीव होत असताना, राजेश आणि वंदना या बदलांशी जुळवून घेण्यासाठी धडपडतात आणि आता आपण मुलांचे आदर्श नाही हे कटू सत्य स्वीकारतात.
राजेशवागलेची भूमिका साकारणारा सुमीत राघवन म्हणतो, “कायमच सुरक्षित वातावरणात वाढलेल्या आपल्या मुलाला, रॅगिंग सारख्या गोष्टीला सामोरे जाताना बघणे राजेशसाठी खूपच अवघड जाणार आहे. एका तरुणाच्या मनावर या गोष्टीचा काय परिणाम होऊ शकतो हे तो जाणतो. तथापि, मुले त्यांच्या स्तरावर गोष्टी हाताळू शकतात आणि तसे करण्याची संधी त्यांना दिली पाहिजे हे स्वीकारण्यास राजेश कसा शिकतो हे बघणे मनोरंजक असेल.”
वंदनावागलेची भूमिका साकारणारी परिवा प्रणती म्हणते, “प्रेक्षकांनी वंदनाला कायमच आपल्या मुलांची खास मैत्रीण आणि त्यांचे ऐकणारी व्यक्ती म्हणून पाहिले आहे, त्यमुळे सखीला असाइनमेंट मिळाल्यावर तिला खात्री असते की तिची मुलगी आदर्श म्हणून तिचीच निवड करणार. आणि जेव्हा तसे होत नाही,तेव्हा तिला अक्षरशः धक्का बसतो आणि ती खट्टू होते. आपली मुले आदर्श म्हणून कोणा दुसर्या व्यक्तीकडे बघतात हे कटू सत्य पचवणे कोणत्याही पालकांसाठी खूप अवघड असते. तथापि, राजेश आणि वंदना दोघेही या प्रक्रियेतून तरतील. ते पुढे सरकतील आणि या परिस्थितीशी देखील जुळवून घेतील पण त्यांची महत्त्वाची मूलभूत तत्त्वे टिकवून ठेवतील.”