
no images were found
आतंकवादी प्रशिक्षण केंद्र , हे पोलिसांना माहित नव्हते का ? – डॉ. रिंकू वढेरा
कोंढवा येथील शाळेमध्ये आतंकवादी कारवायांचे प्रशिक्षण दिले जात आहे, ही गंभीर बाब इतकी वर्षे पोलीस प्रशासनाच्या लक्षात कशी आली नाही ? असे होऊ शकत नाही. प्रशासनाने या परिसरातील नागरिकांच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक होते, असे परखड मत देहली येथील लेखिका आणि इतिहास तज्ञ डॉ. रिंकू वढेरा यांनी व्यक्त केले. त्या ‘इस्लामी शाळा : मदरसा कि आतंकवादी केंद्र ?’ या विषयावर हिंदु जनजागृती समिती आयोजित ऑनलाईन ‘विशेष संवादा’त बोलत होत्या.
डॉ. वढेरा पुढे म्हणाल्या की, हिंदूंनी जागरूक नागरिक होऊन कुठेही अनधिकृत किंवा अयोग्य कृती होतांना दिसल्यास त्वरित आवाज उठवायला हवा. तसेच हिंदूंनी स्वत:च्या मुलांना नियमित मंदिरात नेणे, लहानपणापासून त्यांच्यावर राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणार्थ संस्कार करणे आवश्यक आहे. जेणेकरून एक जागरूक समाज निर्मिती होऊन राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे विचार हिंदू समजमनावर रुजतील.
या संवादात सहभागी झालेले पुणे येथील ‘अपेक्षा’ मासिकाचे संपादक श्री. दत्तात्रय उभे म्हणाले की, मागील 30 वर्षांत वाढलेल्या मुसलमान लोकसंख्येमुळे पुण्यातील कोंढवा या क्षेत्राला ‘छोटा पाकिस्तान’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. या कोंढव्यातील ‘ब्लू बेल्स’ शाळेमध्ये युवकांना आतंकवादी कारवायांचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने उघड केले. इतकी वर्षे स्थानिक पोलीस प्रशासनाच्या हे लक्षात का आले नाही ? अशा शाळांना अनुमती कशी दिली जाते? ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर बंदी आणल्यानंतरही या कारवाया चालू असतील, तर हे खूप गंभीर आहे. माहिती असूनही राजकीय वरदहस्त लाभलेले पोलीस अधिकारी अशा घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात आतंकवादी कारवायांचे प्रशिक्षण दिले जात असेल, तर हिंदूंनी आणि सुशिक्षित नागरिकांनी याविरोधात वेळीच आवाज उठवणे आवश्यक आहे.
या वेळी ‘हिंदु जनजागृती समिती’चे श्री. नागेश जोशी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा विस्तार पुणे येथून केला होता. स्वातंत्र्योत्तर काळानंतर पुणे शहर हे हिंदवी स्वराज्याचा गड होणे अपेक्षित होते; मात्र या ठिकाणी आतंकवादी कारवाया करणारे प्रशिक्षण केंद्र बनत चालले आहे, हे चिंताजनक आहे. त्यामुळे या घटनेकडे प्रशासनाने गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे. यापुढे हिंदूंना संघटित होऊन आक्रमणांचा सामना करावा लागेल.