no images were found
खारघर दुर्घटनेत मृत्यूचा खरा आकडा लपवला जातोय; संजय राऊत यांचा गंभीर आरोप
मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याला गालबोट लागलं. या सोहळ्यादरम्यान काही जणांचा उष्मघातामुळे मृत्यू झाला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात जे मृत्यू झाले ते उष्मघातामुळे नव्हे तर चेंगराचेंगरीमुळे झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. नाना पटोले यांनी केलेल्या आरोपानंतर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील शिंदे, फडणवीस सरकावर गंभीर आरोप केले आहेत.खारघर दुर्घटनेत 50 ते 75 मृत्यू झाल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. हा मृत्यूचा आकडा सरकार लपवत आहे, असा गंभीर आरोप राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे. पाण्याविना सरकारने 50 हून अधिक लोकांचे जीव घेतले असून, पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं जात आहे. खोके सरकारमधील लोक मृतांच्या नातेवाईकांना पैसे देऊन त्यांचं तोंड बंद करत आहेत, असाही आरोप राऊत यांनी केला आहे.
नवी मुंबईतील खारघर इथे 16 एप्रिल 2023 ला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याला गालबोट लागले. कार्यक्रमस्थळी काही लोकांचा मृत्यू झाला. तर काहींचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर प्रेम करणारे जवळपास 20 लाख श्रीसदस्य राज्यभरातून या कार्यक्रमासाठी आले होते. हा सोहळा राज्य सरकारने आयोजित केला होता.