
no images were found
खोक्यांचा विषय काढून शिवसेनेतील बंडखोर आमदारांना पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न
कोल्हापूर : शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाल्यानंतर आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे. राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. आता त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे गटाच्या शैलीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यावरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असताना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर निशाणा साधताना राज्यातील राजकारणामध्ये वेगवेगळे बदल होत आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना राज्याचे नेतृत्व आपल्याला मिळवून द्यायचे आहे असं आवाहन त्यांनी कोल्हापूरच्या जनतेला केले आहे पक्षातून काही आमदारांनी बंडखोरी केली असली तरी काही नियम हे निसर्गनियमासारखे आहेत. पानगळ झाल्याशिवाय नवीन वसंत फुलत नाही. त्यामुळे नवीन वसंत फुलायला सुरुवात झाली आहे असा विश्वास व्यक्त करून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आता जोरदार तयारीला लागावे असंही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील बदलत्या राजकारणाविषयी बोलताना त्यांनी कोल्हापूरच्या राजकीय वातावरणाचीही जोरदार चर्चा केली. हे सरकार जास्त दिवस चालणार नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळवून द्यायची असंही त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सांगितले.कोल्हापूरच्या समाजकारण, राजकारणाचा प्रभाव सगळ्या देशावर पडत असतो. एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात ही कोल्हापूरातूनच सुरु होत असते. त्यामुळे कोल्हापूरातून गेलेला संदेश हा राज्यभर जातो हा येथील इतिहास आहे अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी संजय राऊत यांनी महागाईवरूनही शिंदे-फडणवीस सरकावरही जोरदार टीकास्र केला आहे. राज्यात महागाईने टोक गाठले आहे, तर शेतकऱ्यांचीही अवस्था बिकट झाली आहे.शेतात पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळत नाही, कवडीमोल दराने शेतीमाला विकत घेतला जात आहे. महागाईवरून राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी खोक्यांचा विषय काढून त्यांनी शिवसेनेतील बंडखोर आमदारांना पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.