
no images were found
ज्योतिरादित्य शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील युवकांशी संवाद साधत केलं मोठ विधान
देश आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. नवीन भारत घडविण्यामध्ये युवाशक्तीवर महत्त्वाची जबाबदारी येऊन ठेपली आहे. प्रचंड क्षमता असणारा भारत हा देश असून पंतप्रधान मोदी यांच्या नवीन विचार व संकल्पनावर देश प्रगतीची शिखरे गाठत असल्याचे ते म्हणाले.
आजरा : देश आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. नवीन भारत घडविण्यामध्ये युवाशक्तीवर महत्त्वाची जबाबदारी येऊन ठेपली आहे. प्रचंड क्षमता असणारा भारत हा देश असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून देशाला सक्षम बनवण्याचे काम सुरू आहे. या विधायक कामांमध्ये तरुणानी साथ द्यावी, असे आवाहन नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले. आजरा येथे नवा मतदार युवक युवतींची संवाद प्रसंगी ते बोलत होते.यावेळी बोलताना मंत्री सिंधिया म्हणाले, देशातील एकूण लोकसंख्ये पैकी ९० कोटी लोकसंख्या तरुणाईची आहे. यामुळे युवा पिढीच्या हाती परिवर्तनाची सर्व सूत्रे राहणार आहेत व ते परिवर्तन आता दिसणे गरजेचे आहे. पंतप्रधानांकडे विविध संकल्पना आहेत. सर्वांचा साथ सर्वांचा विकास, सामूहिक प्रयत्न याच्या माध्यमातून देश बळकट करण्याच्या दृष्टीने त्यांची पावले उचलली जात आहेत. यामध्येच देशाच्या तरुणाईची ताकद अधोरेखित होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. तरुणांनी नोकऱ्या मागणारे न बनता नोकऱ्या देणारे बनावे असे त्यांनी स्पष्ट केले.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, गेल्या ७० वर्षांमध्ये केवळ रस्ते, वीज, पाणी या सुविधावरच लक्ष केंद्रित करण्यात आले. याव्यतिरिक्तही अनेक प्रश्न दुर्लक्षित असल्याने मोदी सरकारने अनेक महत्त्वकांक्षी योजना राबविल्या.
कोल्हापूर जिल्ह्याची गरज ओळखून आधुनिक तंत्रज्ञान व कोल्हापूरचा इतिहास याची सांगड घालून लवकरच कोल्हापूरच्या इतिहासाला शोभेल, असे नूतन विमानतळ उभारणीच्या हालचाली सुरू असून लवकरच ते पूर्णत्वास येईल कोल्हापुरात 280 कोटींचे नवीन विमानतळ उभे करणार असेही यावेळी मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शिंदे यांनी सरसेनापती प्रतापराव गुर्जर स्मारकाला भेट दिली.सरसेनापती प्रतापराव गुर्जरांसह सात वीरांच्या इतिहास, स्मृती-संग्रामातून देश कार्य करण्याची ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यात सहकार, पर्यटन, उद्योग वाढीला चांगला वाव आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असेही त्यांनी सांगितले