
no images were found
सामाजिक समता पर्व अंतर्गत युवा गटांकरीता कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत संविधान दिन दिनांक 26 नोव्हेंबर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन दि. 6 डिसेंबर हा कालावधी सामाजिक समता पर्व म्हणून साजरा करण्यात येत असून सामाजिक समता पर्वामध्ये दर दिवशी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. समता सप्ताहाचा एक भाग म्हणून आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ येथे युवा गटांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेस जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश घुले, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी, जिल्हा उद्योग अधिकारी संकेत कदम, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर एस. सावळकर उपस्थित होते. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्री. माळी यांनी शासनाच्या कौशल्य विकास विभागाकडून युवकांसाठी असणारे प्रशिक्षणाचे कार्यक्रम व त्यातुन रोजगार निर्मीती या विषयावर उपस्थित युवकांना मार्गदर्शन करुन युवकांच्या त्याबाबत असलेल्या शंकांचे निरसन केले.
जिल्हा उद्योग अधिकारी श्री. कदम यांनी उद्योग विभागामार्फत नवउद्योजकांना केले जाणारे अर्थसहाय्य व CMEGP व PMEGP या योजनांबाबत मार्गदर्शन करुन युवकांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सावळकर यांनी पशुसंवर्धन विभागाकडे युवकांसाठी असणाऱ्या योजना आणि त्यातुन कशाप्रकारे प्रगती करु शकतात याबाबत मार्गदर्शन केले.
समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त श्री. लोंढे यांनी सामाजिक न्याय विभागाची युवक कल्याणामधील भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेस जिल्ह्यातील एकूण 80 युवक, युवती उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका समन्वयक सचिन परब, प्रस्तावना समाज कल्याण निरिक्षक सुप्रिया काळे व आभार तालुका समन्वयक यांनी मानले.
समता पर्वातंर्गत दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता चंद्राबाई शेंडूरे महाविद्यालय, हुपरी येथे तृतीयपंथी कल्याण व हक्कांचे संरक्षण अंतर्गत तृतीयपंथीयांचे हक्क, अधिकार बाबत महाविद्यालयीन विदयार्थ्यांना व तृतीयपंथी व्यक्तीयांना मार्गदर्शनपर व्याख्यान व राष्ट्रीय पोर्टल वरील प्रमाणपत्र व ओळखपत्र वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. लोंढे यांनी केले आहे.