
no images were found
वन विभागाचा मसाई पठार संवर्धन राखीव क्षेत्राबाबत खुलासा
कोल्हापूर : जिल्ह्यातील वनविभागाच्या पन्हाळा वनपरिक्षेत्रातील मौजे बांदीवडे, बादेवाडी, इंजोळे तसेच मलकापूर वनपरिक्षेत्रातील वरेवाडी व खोतवाडी या एकूण 5 गांवातील 533.92 हेक्टर आर फक्त वनक्षेत्र मसाई पठार संवर्धन राखीव क्षेत्र (Conservation Reserve Area) म्हणून अधिसूचना प्रसिध्द झालेली आहे. अधिसूचनेच्या अनुषंगाने संवर्धन राखीव क्षेत्राबाबत लोकांच्या मनात संभ्रम, गैरसमज निर्माण झाला असल्याने कोल्हापूर वनविभागाने खालीलप्रमाणे खुलासा केला आहे.
पन्हाळा तालुका जैवविविधतेने समृध्द असून या क्षेत्रातील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्यटन आणि ऐतिहासिक वारसा स्थळे आढळून येतात. या तालुक्यात इतिहासाची साक्ष देणारा पन्हाळगड, पावनगड व मुढगड हे किल्ले आहेत. तसेच भौगोलिकदृष्टया एक महत्वाचा घटक म्हणजे मसाई पठार या तालुक्यात आढळून येते. मसाई पठार मध्ये विविध प्रकारची जैवविविधता मोठ्या प्रमाणात आढळून येते. मसाई पठार हे निसर्गरम्य सौंदर्यासाठी आणि विविध प्रकारच्या हंगामी वन्यफुलांसाठी ओळखले जाते. तसेच मसाई पठारचा एक टोकाचा कडा बांदीवडे गावाजवळ भौगोलिकदृष्ट्या दुर्मिळ प्रकारचे अशनीस्तंभ आढळून येतात. तसेच या ठिकाणी पांडव लेणीही दिसून येतात. संवर्धन राखीव क्षेत्रामुळे वन्यप्राण्यांनाही चांगल्या प्रकारे सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. तरी या सर्व जैवविविधता आणि ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन करण्यासाठी तसेच पर्यावरणीय दृष्टीकोनातून विकास साधण्यासाठी मसाई पठार संवर्धन राखीव क्षेत्र शासनाने घोषित केले आहे.
या संवर्धन राखीव क्षेत्राच्या अधिसूचनेमध्ये कोणत्याही खासगी मालकीचे क्षेत्र समाविष्ठ केलेले नाही. त्यामुळे संवर्धन राखीव क्षेत्राच्या आजूबाजूच्या गांवास व खासगी मालकी क्षेत्रास कोणतीही बंधने असणार नाहीत, अशी माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी दिली आहे.