no images were found
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत-न्यूझीलंड ‘एफटीए’ ऐतिहासिक-हेमंत पाटील समृद्धीचा नवा मार्ग प्रशस्त होणार
पुणे, : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मुक्त व्यापार करार (एफटीए) हा देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी एक ‘अविस्मरणीय क्षण’ असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळेच भारत आंतरराष्ट्रीय व्यापारात नवनवीन शिखरे सर करत आहे, असे प्रतिपादन ‘भारत अगेन्स्ट करप्शन’चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मंगळवारी (ता.२८) केले. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे जाहीर आभार मानले आहेत.
न्यूझीलंडने केलेली २० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची वचनबद्धता कृषी, उत्पादन आणि तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उभारी देईल. विशेषतः भारतीय वस्त्रोद्योगासाठी न्यूझीलंडची बाजारपेठ सुवर्णसंधी आहे. न्यूझीलंडच्या एकूण आयातीत परिधान क्षेत्राचा वाटा ६५ टक्के असून, तिथल्या उच्च प्रतिव्यक्ती उत्पन्नाचा फायदा भारतीय कापड उत्पादकांना, विशेषतः सुती आणि मानव निर्मित फाइबर अर्थात एमएमएफ कपड्यांच्या निर्यातीसाठी होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
हा करार केवळ व्यापार मर्यादित नसून तो समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करणारा आहे, असे पाटील यांनी नमूद केले. कृषी मालाला जागतिक बाजारपेठ मिळेल आणि लघु उद्योगांना निर्यातीची दारे उघडणार असल्याने शेतकरी आणि एमएसएमई क्षेत्राला त्याचा फायदा आहे. स्टार्ट-अप्स आणि नवप्रवर्तनामुळे रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होतील.भारतीय हस्तकला आणि कारागिरांच्या कौशल्याला योग्य मूल्य मिळेल, तर विद्यार्थ्यांना प्रगत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्याच्या संधी उपलब्ध होतील, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान मोदींच्या सक्षम नेतृत्वामुळे जागतिक स्तरावर भारताची विश्वासार्हता वाढली आहे. हा मुक्त व्यापार करार विकासाच्या नवीन वाटा खुल्या करणारा आणि दोन्ही देशांमधील परस्पर समन्वय अधिक दृढ करणारा ठरेल, असा विश्वास हेमंत पाटील यांनी व्यक्त केला. या करारामुळे भारत आता जागतिक पुरवठा साखळीत एक प्रबळ केंद्र म्हणून उदयास येत असल्याचेही पाटील यावेळी म्हणाले.