no images were found
शिवाजी विद्यापीठात २४ एप्रिलला शाश्वत शेती परिषद
कोल्हापूर : शेतकऱ्यांची उत्पन्नवाढ, शेतीची शाश्वतता आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने शिवाजी विद्यापीठात उद्या “शाश्वत शेती व कृषी अर्थव्यवस्थेच्या क्षमता वृद्धीसाठी” या विषयावर एकदिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.
शिवाजी विद्यापीठ, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि भारतीय किसान संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात होणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी, स्वयंसहायता बचत गटांच्या महिला तसेच ग्रामीण विकास क्षेत्रातील घटकांसाठी ही परिषद अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी माहिती यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. नितीन माळी यांनी दिली.
या परिषदेत शाश्वत शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पद्धती, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यायी पीक पद्धतींचा अवलंब, सेंद्रिय शेतीचे महत्त्व, जलसंधारणाचे उपाय यावर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. कृषी प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून मूल्यवर्धन, उत्पादनाचे ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि बाजारपेठेतील संधी याविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल. ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी स्वयंसहायता बचत गटांच्या माध्यमातून पूरक व्यवसाय, लघुउद्योग, घरगुती उत्पादन आणि उद्योजकतेच्या संधी यावर विशेष सत्र आयोजित केले आहे. यामुळे महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी आणि उत्पन्नवाढीसाठी आवश्यक दिशा मिळेल. परिषदेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, कृषी अधिकारी, अनुभवी प्रगतशील शेतकरी मार्गदर्शन करणार आहेत. यामुळे सहभागी शेतकरी व महिलांना प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी प्रेरणा मिळेल. तसेच शाश्वत शेतीविषयी जागरूकता वाढून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही डॉ. माळी यांनी व्यक्त केला.