no images were found
सुप्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे आणि समीर धर्माधिकारी यांचं मराठी मालिका विश्वात पुनरागमन
स्टार प्रवाहवर भेटीला येणाऱ्या आनंदी या मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या पहिल्या प्रोमोला अवघ्या काही तासांत २ मिलियन पेक्षा जास्त व्हूज मिळालेत. या मालिकेतून मराठी सिनेसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार म्हणजेच अरुण नलावडे आणि समीर धर्माधिकारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आनंदी मालिकेच्या निमित्ताने दोघेही बऱ्याच काळानंतर मालिका विश्वात पुनरागमन करणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे आनंदीच्या आजोबांची म्हणजेच आत्माराम जाधव ही व्यक्तिरेखा साकारणार असून समीर धर्माधिकारी प्रसिद्ध उद्योगपती युगंधर निंबाळकर यांची भूमिका साकारणार आहेत.
या भूमिकेविषयी सांगताना समीर धर्माधिकारी म्हणाले, ‘स्टार प्रवाहसोबतची माझी ही पहिली मालिका. जवळपास ७ वर्षांनंतर पुन्हा मालिका करतोय. प्रचंड उत्सुकता आहे. मालिकेची टीम खूप छान आहे. वेगळा विषय हाताळला जातोय. युगंधर ही व्यक्तिरेखा मी साकारणार आहे. युगंधरला कामापेक्षा महत्त्वाचं काही नाही. काम म्हणजे धर्म त्याच्यासाठी. गावातील माणसांसाठी युगंधरचा शब्द हा अंतिम असतो. याचं कारण म्हणजे एक काळ असा होता जेव्हा गावातले लोक बेरोजगार होते. त्यावेळी घरटी प्रत्येकाला त्याने त्याच्या मिलमध्ये काम दिलं. त्यामुळे कित्येक संसार तरले, घरं तरली. आजही लोक त्याला देव मानतात. प्रेक्षकांना ही मालिका आणि माझी भूमिका नक्की आवडेल याची खात्री आहे.’
आत्माराम जाधव म्हणजेच आबा इचलकरंजीत आपल्या तीन नातींसोबत रहातात. त्यांची मुलगी वसुधा आणि जावई हे एका अपघातात गेले. तीन नातींसाठी त्यांनी स्वतःला या धक्यातून सावरलं आणि उतार वयातही जोमाने काम करायची धडपड सुरू ठेवली. ते युगंधरच्या मिलमध्ये काम करतात. आनंदीला दृष्टी नसली तरी आबांनी आयुष्य बघायचा दृष्टिकोन तिला दिला. आबांचं एकच स्वप्न आहे ते म्हणजे तिघी नातींनी शिकावं, स्वत:च्या पायावर उभं रहावं आणि त्यांचं चांगल्या घरात लग्न व्हावं. या मालिकेच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे जवळपास तीन वर्षांनंतर मालिका विश्वात पुनरामगन करणार आहेत. याविषयी सांगताना अरुण नलावडे म्हणाले, ‘खूप वेगळी भूमिका आहे. अश्या पद्धतीच्या भूमिका खूप कमी मिळतात. आई-वडिलांचं छत्र गमावलेल्या तीन नातींच्या आजोबांची भूमिका मी साकारणार आहे. या तिन्ही मुली खूप गोड आहेत. माझा स्वभाव तसा मितभाषी आहे. मात्र या तिन्ही गुणी अभिनेत्रींसोबत छान गट्टी जमलीय. खूप आदराने त्या सर्वांशीच वागतात. तिघींचे स्वभाव वेगळे आहेत. नवं काहीतरी शिकण्याची त्यांची सतत धडपड सुरु असते. त्यामुळे मी देखिल बऱ्याच नव्या गोष्टी त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतोय. स्टार प्रवाह वाहिनी मालिकेची गोष्ट खूप छान पद्धतीने पुढे नेईल याची खात्री आहे.’